जागतिक आदिवासी दिन: आदिवासी समाज मुख्य प्रवाहात कधी येणार?

Update: 2020-08-09 02:25 GMT

आज जागतिक आदिवासी दिन आहे. पण तो कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नेहमीप्रमाणे उत्साहात तसेच विविध उपक्रम राबवत साजरा होत नाहीये. आदिवासी या शब्दाला हजारो वर्षाचा इतिहास आहे.

जंगल, डोंगरदऱ्यात राहणारा, बाहेरच्या जगाशी संपर्क नसणारा, अशी त्याची ओळख आहे. लोककला, वारली चित्रकला, पारंपरिक तारपा नृत्य आणि शिल्पकला या त्यांच्याच कलांमधून आदिवासी समाजाला प्रगतीची कवाडे उघडली गेली. हा समाज निसर्गातील प्रत्येक वस्तुला आपले दैवत मानतो आणि निसर्गावर भरभरून प्रेम करतो.

संयुक्त राष्ट्रसंघाने या आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे हक्क, अधिकाराचे रक्षण व्हावे यासाठी १९९३ साल हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. आदिवासी हे मूलनिवासी असून भारतात एकूण ४६१ जमाती आहेत. भारताच्या प्रत्येक राज्यात आदिवासी समाजाचे प्राबल्य असून आरक्षणामुळे हा समाज आता हळूहळू मुख्य प्रवाहात सामील होत आहे. आपल्या राज्यात भिल्ल,गोंड, वारली, कातकरी, माडिया, कोकणा, ठाकूर या जमाती आहेत.

पण शेकडो वर्षांपासून हा समाज अन्याय सहन करत आला आहे. रानावनात राहणारा हा समाज शिक्षणापासून खूप दूर राहिला. परिणामी समाजात निरक्षरतेचे प्रमाण प्रचंड वाढत गेले. शेती, शेठजीच्या वाड्या व वीटभट्टीवर मजूर म्हणून तो राबत राहिला. पिढ्या न पिढ्या हे असंच चालत राहिले. रोजगाराच्या शोधात कुटुंबाच्या आरोग्याकडेही त्याचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मुलांमध्ये कुपोषण व अन्य आजाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले.

दरवर्षी आपल्या देशात लाखो कुपोषित बालके मृत्युमुखी पडतात. आरक्षणामुळे त्यांना शिक्षण व राजकिय क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळाले. आज लोकसभा व विधानसभेत अनेक आदिवासी खासदार व आमदार आपण पाहतो, त्यापैकी अनेक जण मंत्रीपदेही भूषवत आहेत. पण समाजाच्या दुर्देवाने या लोकप्रतिनिधींनी समाजाच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळे एकविसावे शतक उजाडले तरी हा समाज आजही काळोख्या अंधारात चाचपडत आहे.

"उष:काल होता होता,काळ रात्र झाली," असं म्हणायची पाळी या समाजावर आली आहे. गेली अनेक वर्षे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण ज्या दिवशी या समाजातील निरक्षरता संपून आदिवासींची मुले शिक्षण, रोजगार, आरोग्य व उद्योगधंद्याच्या मुख्य प्रवाहात सामील होतील, तो दिवस खऱ्या अर्थाने "जागतिक आदिवासी दिन” असेल.

Similar News