“प्रचलित” मार्केट तत्वज्ञान !
अर्थव्यवस्थेबद्दल नाही सर्वसमावेशक “राजकीय अर्थव्यवस्थे”बद्दल का बोललं जात नाही ? प्रचलित मार्केट तत्वज्ञान म्हणजे काय ? पर्यावरणकेंद्री पर्यायी मार्केट तत्त्वज्ञान का गरजेचं ? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचं मत
मी बँकेकडून बाजारभावाने कर्जे घेऊन Stock Market / Real Estate / Cryptocurrency शेअर मार्केट / रिअल इस्टेट / क्रिप्टो करन्सी च्या सट्टेबाजीत घालीन ; तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी तर कर्जावरचे व्याज भरणार आहे !
शेती, एमएसएमई, सेल्फ हेल्प ग्रुप, लघुउद्योगांना कर्जे उपलब्ध होत नसतील तर माझा काय दोष ? मी कालव्यातून पाणी घेऊन त्याची शीतपेये बनवीन नाहीतर बिअर ; किंवा पंचतारांकित किंवा माझ्या घरात स्विमिंग पूल. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी बाजारभावाने पाण्याचा भाव मोजायला तयार आहे. माणसांना , गुरांना , शेतीला पाणी कमी मिळाले तर माझा काय दोष ?
मी शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेऊन, त्या काही वर्षे पाडून ठेवीन मग उद्योगांना / रियल इस्टेट कंपन्यांना चढ्या भावाने विकेन. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी बाजारभावाने जमिनीचा भाव मोजायला तयार आहे. शेतकरी कर्जबाजारीपणामुळे डिस्ट्रेस सेल करत मिळेल त्या किमतीत देखील विक्री करतात - हे खरेतर ते सांगत नाहीत.
मी जमिनी दाबून ठेवल्यामुळे जमिनीचे भाव वाढणार असतील तर माझा काय दोष ? मी हॉटेल मध्ये पदार्थ ऑर्डर केले आहेत ; मी खाईन नाहीतर तसेच टाकून देईन. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी तिथल्या लावलेल्या किमतीप्रमाणे बिल भरायला तयार आहे.
लाखो लोकांना साधे पोटभर खायला मिळत नाही तर माझा काय दोष ? हे करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा व्यक्तिगत काहीच दोष नाही ; त्या जे काही करत आहेत ते एकतर प्रचलित कायद्याप्रमाणे करीत आहेत किंवा प्रचलित कायदे त्यांना आडकाठी करत नाहीत.
प्रश्न विचारला पाहिजे : कायदे कोण बनवतो ? आणि ते तसेच का बनवतो ? कायदे बनवण्याची दुसरी पद्धत असूच शकत नाही का ? किंवा अगदी उघड उघड खटकणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करणारे कायदे कधीच का बनवले जात नाहीत ?
“प्रचलित” मार्केट तत्त्वज्ञान वस्तुमाल / मत्ता विकणार ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे , मग त्यांनी त्याचा उपभोग घ्यावा , नाश करावा , किंवा पाडून ठेवावे किंवा दामदुपटीने अजून कोणाला विकावे. “प्रचलित” मार्केट तत्वज्ञान अर्थकारणाचे सामाजिक , नैतिक , पर्यावरणीय , राजकीय पैलू असतात या जमिनी सत्याला माहित असून नाकारते. स्वकेंद्री धनदांडग्यांची धन करणारे आर्थिक तत्वज्ञान आहे ते ! म्हणून अर्थव्यवस्थेबद्दल नाही सर्वसमावेशक “राजकीय अर्थव्यवस्थे”बद्दल बोलले पाहिजे.
सर्वात मूलभूत प्रश्न आहे.......तुम्ही / आपण जोरात बोलणार आहोत का? “हो आम्हाला प्रॉब्लेम आहे “ !
वरील वाक्यात महत्वाचा शब्द आहे “प्रचलित”... मार्केट तर पुरातन काळापासून अस्तित्वात होती. एकविसाव्या शतकासाठी, तरुण आणि न जन्मलेल्या पिढ्यांच्यासाठी जनकेंद्री आणि पर्यावरणकेंद्री पर्यायी मार्केट तत्त्वज्ञान हवे आहे. तरुणांनो यावर काम करा.
संजीव चांदोरकर
अर्थतज्ज्ञ