लोकमान्य टिळक अखिल भारताचे पहिले नेते. झुंजार पत्रकार. साक्षेपी संपादक. अनेकदा तुरूंगवास भोगलेले स्वातंत्र्य सैनिक. गीतारहस्य या मौलिक ग्रंथाचे लेखक. महात्मा फुल्यांनी सुरू केलेला शिवजयंतीचा सोहळा देशभर पोचवणारे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक. विचारवंत. खर्या अर्थाने लोकमान्य!
त्यांना जाऊन आज 98 वर्षे झाली.
आजही आपण टिळक पगडी की फुले पगडी यावरून एकमेकांची डोकी फोडलीच पाहिजेत का? कोण चुकले नी कोण बरोबर होते याच्या किर्द वह्या-चोपड्या आणखी किती काळ आपण डोक्यावर मिरवायच्या? ही जुनी वैरं आणखी किती काळ आजच्या पिढ्यांनी वागवायची?
प्रतिकात अडकायचं की विचारांचा वारसा घ्यायचा?
1.
कोल्हापूरच्या छत्रपतींच्या वंशजांचा छळ केल्याबद्दल दिवाण बर्वे यांच्यावर केसरी-मराठा मध्ये टिळक आगरकरांनी टिकेचे आसूड ओढले. बर्व्यांनी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला भरला. या दोघांना अटक झाली. त्यांना मुंबईत डोंगरीच्या तुरूंगात ठेवले होते. ब्रिटीश कोर्टाने त्यांच्याकडे दहा हजार रूपयांचा जामीन मागितला. [ज्या काळात सोन्याचा तोळ्याचा भाव पंधरा रूपये होता तेव्हाचे दहा हजार रूपये म्हणजे आजचे किती झाले? ]
महात्मा फुले आणि टिळक-आगरकरांचे वैचारिक मतभेद होते. तरिही टिळकांची तार मिळताच रातोरात जोतीराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेट बापूशेट उरवणे यांना दहा हजार सुरती रूपये घेऊन मुंबईला पाठवले. टिळक-आगरकरांच्या जामीनाची सोय केली. पुढे टिळक-आगरकर तुरूंगातून सुटल्यावर त्यांची मिरवणूक काढून त्यांचा जाहीर सत्कार केला. त्यांना मानपत्र दिले. स्वत: टिळकांनी त्याबद्दल आपल्या वर्तमानपत्रातून फुल्यांना जाहीरपणे धन्यवाद दिले.
पुढे फुले वारल्यावर टिळक-आगरकरांनी त्यांच्या निधनाची एका ओळीचीसुद्धा बातमी दिली नाही.
2.
1 ऑगष्ट 1920 ला टिळक गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायकचे संपादक होते. त्यांनी बातमी दिली. पण एका ओळीची. "कळवण्यास दु:ख वाटते की काल पुण्याचे बा.गं. टिळक यांचे सरदार गृहात निधन झाले."
टिळक अनुयायी संतापले. त्यांनी बाबासाहेबांना घेरले. बाबासाहेब म्हणाले, "त्यांनी फुल्यांची बातमीसुद्धा दिली नव्हती. आम्ही दिली.
आम्ही मूकनायक काढला तेव्हा केसरीला विनंती केली की हा पेपर सुरू झाल्याची बातमी तुम्ही छापल्यास लोकांना या पेपरची माहिती होईल. पण त्यांनी बातमी दिली नाही.
आमच्या पेपरची जाहीरात छापा, आम्ही त्याचे पैसे देतो असे आम्ही सांगितले तर केसरीने कळवले, "जागा नाही."
त्याचकाळात केसरीतल्या जाहीराती कोणत्या होत्या?
तर "लोकमान्य जोडा" चपलेच्या दुकानाच्या जाहीराती."
3.
महात्मा गांधीजी लोकमान्यांना आणि गोखल्यांना गुरूस्थानी मानायचे. लोकमान्य गेले तेव्हा गांधीजींना अंत्ययात्रेत त्यांच्या तिरडीला खांदा द्यायचा होता.
गांधीजी हलक्या जातीचे आहेत असे सांगून टिळक अनुयायांनी त्यांना नकार दिला. टिळक अनुयायी कमालीचे सनातनी. संकुचित. आजही त्यांच्यात फारसा फरक पडायला तयार नाही.
4.
टिळकांनी छत्रपती शाहूंच्या वेदोक्त प्रकरणात सनातन्यांची बाजू घेतली. शाहूराजे दुखावले गेले.
ताईमहाराज प्रकरणात टिळकांवर बलात्काराचा खटला भरला गेला. टिळक न्यायालयात निर्दोष ठरले.
शाहूंनी ताईमहाराजांची बाजू घेतली होती हे टिळक कधीही विसरले नाहीत. या दोघांच्या चुकांची किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागली. लागतेय.
5.
अण्णाभाऊ कम्युनिस्ट. अण्णाभाऊ, अमर शेख, गव्हाणकर हे तिघे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार-शाहीर. श्रीपाद अमृत डांगे त्यांचे नेते. डांगे कट्टर टिळकभक्त. त्यांना फुले शाहूंची अॅलर्जी. त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचा महात्मा फुले विशेषांक काढावा यासाठी त्यांच्या संपादकांनी हट्ट धरला. डांगे तयार नव्हते. शेवटी त्यांनी राजीनाम दिला तेव्हा डांगे तयार झाले.
अण्णाभाऊंनी आपली "फकीरा" कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली.
"जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव," हे त्यांनी लिहिलं हे पक्षातल्या अनेकांना खटकलं.
अण्णाभाऊंनी आपला पोवाडा मायभू, शिवराय नी लोकमान्य टिळक यांच्या चरणी अर्पण केलेला.
अण्णाभाऊंची अपार उपेक्षा झाली. एक महान कादंबरीकार, जागतिक किर्तीचा साहित्यसम्राट, लोकशाहीर, लोकनाट्यकार, पण दलित.
ते गेले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला खुप कमी लोक हजर होते. आज त्यांचे कोट्यावधी रूपयांचे पुतळे राहाताहेत पण अण्णाभाऊ गेले तेव्हा उपाशीपोटी गेले होते.
6.
गुरूवर्य य.दि,फडकेसरांनी त्यांचा पहिला वैचारिक ग्रंथ टिळक-आगरकरांवर लिहिला. सर मूळचे रहस्यकथा लेखक. त्यांनी पुस्तकाला नाव दिलं "शोध बाळगोपाळांचा."
तर एका संस्थेने या पुस्तकाला बाल वाड्मयाचा पुरस्कार दिलेला.
त्यांनी वाचायचे सोडा पुस्तक चाळलेही नसणार!
7.
मी संपादित केलेला "आम्ही पाहिलेले फुले" हा ग्रंथ एका बहुजन महाविद्यालयातील बहुजन ग्रंथपालांनी बॉटनी विभागात ठेवलेला आढळला. आम्ही "पाहिलेली" फुले=फ्लाॅवर्स, असे समजून.
8.
पुण्यात ब्रिटीशांनी भाजी मंडई बांधायला काढली. त्याला दोघांनी कसून विरोध केला. एक फुले नी दुसरे टिळक. कारणं वेगळी पण विरोध पक्का.
पण मंडई उभी राहिलीच. पुढे आचार्य अत्र्यांनी त्या मंडईला महात्मा फुल्यांचे नाव दिले आणि पुणेकरांनी त्या मंडईत लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा केला.
धन्य ते पुणेकर! म्हणजे धन्य ते आम्हीच!
1 ऑगष्ट 1920- लोकमान्य गेले. अण्णाभाऊ जन्मले.
दोघांना विनम्र आदरांजली.
-प्रा. हरी नरके