भारताची एक पक्षीय हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल: अमर गोडसे

चीन मध्ये जशी एक पक्षीय हुकुमशाही आहे अगदी तशीच एकपक्षीय हुकूशाही हळूहळू आपल्याकडे देखील येत आहे, असं अमर गोडसे यांनी विश्लेषण केले आहे.

Update: 2022-03-20 04:09 GMT

थोडासा फरक असा आहे कि चीनमधल्या एकपक्षीय हुकुमशाहीची सुरुवात साम्यवादातून झाली असल्याने तिथे सामान्य माणसांचे जीवनमान थोडे तरी बरे आहे आणि मुलभूत सोईसुविधांच्या बाबतीत तरी संपूर्ण चीनचे इन्फ्रास्ट्रक्चर बरेच सुधारलेले दिसते (टीव्हीवर तरी)....

मात्र चीन मधील सामान्य माणसाच्या स्वातंत्र्यावर बरीच बंधने आलेली दिसतात आपल्याकडे जी एकपक्षीय हुकुमशाही येत आहे तिचा पाया भांडवलशाहीचा तसेच धार्मिक व जातीय ध्रुवीकरणाच्या माध्यमातून द्वेशाच्या विकृत राजकारणाचा आहे त्यामुळे देशात उत्तरोउत्तर प्रचंड प्रमाणात विषमता निर्माण होत आहे आणि पुढे ती वाढत जाणार आहे.आगामी काळात निर्माण होणारया ह्या अर्थिक व सामाजिक विषमतेचे परीणाम खूपच महाभयंकर असणार आहेत.

संपूर्ण देशाची 90% साधनसामग्री 10% लोकांकडे केंद्रित होणार आणि इतर 90% लोक त्यांचे गुलाम बनणार. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असला तरी ते मत नक्की कुठे जात आहे हे कुणाला कधी कळणार नाही.

एकपक्षीय हुकुमशाही येण्याची प्रक्रिया 2012 पासून सुरु झाली तत्कालीन काळात काँग्रेसची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्यासाठी अगदी नियोजन बद्ध पद्धतीने केली गेलेली जनआंदोलने आणि तेव्हापासून माध्यमांवर सुरु झालेला भडक प्रचार-अपप्रचार....

2014 साली या प्रक्रियेचा एक निर्णायक टप्पा पूर्ण झाला आणि पुढे त्याची घोडदौड सुरु झाली.

यात सर्वात मोठा दीर्घकालीन अडथळा काँग्रेसचा असल्याचे विजीगिषु पक्षाने आधीच ताडले होते कारण काँग्रेस कितीही कमकुवत झाली असली तरी देशभर अस्तित्व असलेला तो एकमेव पक्ष आहे हे एकपक्षीय हुकूशाहीच्या प्रेमात पडलेल्यांना अगदी चांगल्या प्रकारे ठाऊक होतं.

तेव्हापासून काँग्रेस मुक्त भारताच्या घोषणा सुरु झाल्या व त्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्नही सुरु झाले. प्रत्येक राज्यातून काँग्रेसला नेस्तनाबूत करण्यासाठी राजकीय तसेच यांत्रिक-तांत्रिक डावपेचही लढवण्यात आले.

वेगवेगळ्या राज्यातील प्रादेशिक पक्ष सध्या वाढले तरी चालतील पण काँग्रेस संपली पाहिजे अशा हेतूने अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षांना बळ देण्यात आले.परस्पर काँग्रेसचा काटा निघतोय आणि आपला फायदा होतोय हे पाहून प्रादेशिक पक्षांनीही यात हात धुवून घेतला.

एकदा काँग्रेस पूर्ण संपल्यावर ही एकपक्षीय हुकुमशाही या प्रादेशिक पक्षांचा कधी हिशोब चुकता करेल ते त्यांनाही कळणार नाही.तोपर्यत मात्र देशभरातील सर्वच संधीसाधू प्रादेशिक पक्ष थोडीफार सत्तेची गाजरे खात राहतील.




 


बिहारच्या निवडणुकीत राजदला इतकेच यश मिळाले कि ते प्रबळ विरोधी पक्ष बनतील पण सत्तेवर येणार नाहीत. डाव्यांच्याही चांगल्या जागा आल्या जेणेकरून ते काही काळ तरी संतुष्ट राहतील त्यामुळे भांडवलशहांना तिथली सत्ता चालवण्यात आणि पुढच्या रणनीतीची पायाभरणी करण्यास वेळ मिळेल.

उत्तर प्रदेश मध्ये देखिल समाजवादी पार्टीला भाजपाचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून अगदी जाणीवपूर्वक व नियोजन बद्ध पद्धतीने प्रोजेक्ट केले गेले जेणेकरून काँग्रेसला स्पेस राहणार नाही.

राजकीय पक्षांचे काय होईल ते होवो पण सामान्य लोकांनी आपले हित लोकशाही जपण्यात आहे हे ओळखले पाहिजे.काँग्रेस उभी राहत नसेल तर दुसरा देशव्यापी पर्याय निर्माण व्हायला पाहिजे जे सध्यातरी अवघड दिसते.

किमान निवडणूक यंत्रणा निष्पक्षपातीपणे काम करीत आहे की नाही यावर तरी लोकांचे बारकाईने लक्ष हवे. अन्यथा इंग्रजांशी लढून मिळालेल्या स्वातंत्र्याबरोबरच आपणा सर्वांना काहीसा सहजासहजी मिळालेला 'एक व्यक्ती-एक मत' हा अधिकार आपण गमावून बसू (सध्या तो आधीच अदृश्यपणे गमावला आहे की काय हे कळायला मार्ग नाही ? )

युरोप-अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाही देशांत हा अधिकार मिळविण्यास सामान्य लोकांना पूर्वी खूप झगडावे लागले होते.

त्यामुळे त्याची किंमत ते जाणून आहेत आपणही ती किंमत ओळखली पाहिजे आणि लोकशाही टिकवली पाहिजे.

जय भारत...जय संविधान...!!

#आम्हीभारताचेलोक

- अमर गोडसे

Tags:    

Similar News