New Economic Year : एक एप्रिल, रिजर्व बँक आणि डॉ.आंबेडकर

1 एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात. जुन्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद 31 मार्चला संपला की नवं आर्थिक वर्ष सुरु होतं. पण हे आर्थिक वर्ष 1 एप्रिललाच का सुरु होतं? यामागे कुणाची प्रेरणा होती? याबाबतचे अभ्यासक वैभव छाया यांनी या ऐतिहासिक योगदानावर टाकलेला प्रकाश...

Update: 2023-04-01 02:31 GMT

आज आपण रिझर्व बँकेच्या (Reserve Bank) अस्तित्वाला अनुभवतो. सुरक्षिततेची भावना अनुभवतो आहोत.पण, जेव्हा देश स्वतंत्र ही झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची कल्पना केली होती. आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो, वित्त आयोग (Finance Commission), राज्यांची मागणी असते ती म्हणजे इतके पैसे कोण देईल, इतके पैसे कोण घेईल. कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल. देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते. वित्त आयोगाची आणि संपत्तीची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी असावी, याचे सखोलपणे त्यांनी विचार मांडले होते आणि त्याच विचारांच्या प्रकाशात आज हा वित्त आयोग, मग ती आरबीआय (RBI) असो... अशा अनेक संस्था आहेत.

रिजर्व बँक हि एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिक नीतीवर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजना ठरवते. भारतीय वित्त व्यवस्थेवर नियंत्रण तसेच महत्वाचे निर्णय घेते.

रिजर्व बँक १ एप्रिल १९३५ साली ब्रिटीश राजवटीत स्थापन झाली. १९३५ साली स्थापन झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्टचा (Hilten Commission Report For RBI) आधार घेण्यात आला. रिजर्व बँक ऑफ इंडिया हि संपूर्णपणे डॉ बाबासाहेबांच्या विचारावर, आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे अव्याहत सुरु आहे.

बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये केलेलं विवेचन इतकं जबरदस्त होतं की ब्रिटीश सरकारने वसाहतवादाच्या नावाखाली भारतातील परंपरागत व्यवसायांचं चालवलेलं शोषण जगासमोर उघडं पडलं. तत्कालीन काँग्रेसने आंबेडकरांच्या या मांडणीला उचलून धरत ब्रिटीशांना ताणून धरलं. त्याचीच परिणीती लंडनहून एकुण प्रकरण तपासण्यासाठी रॉयल कमिशनच्या (Royal Commission) स्थापनेत झाली.

१९३५ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटीश राजवटीतील भारतीय अर्थ व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिजर्व बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचे ठरले, जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणी बँकांवर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील. रिजर्व बँक १९२५ साली भारतात नेमलेल्या रॉयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशन च्या रिपोर्ट आणि तपशिला वरून बनवण्यात आली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या तीनही आर्थिक ग्रंथांचा उपयोग करून तसेच त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिजर्व बँकेच्या स्थापनेचा पाया ठरला. १९४९ साली रिजर्व बँक हि अधिकृत आणि संपूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आली.

१९३५ मध्ये जेव्हा रिजर्व बँकेची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे,आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती. याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. याच वर्षी रमाई (Ramai) बाबासाहेबांना सोडून गेली. याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक (Nashik Yevla) इथे मोठी सभा घेतली आणि मी हिंदू म्हणून मारणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आणि याच कालावधीत बाबासाहेबांचा दस्तावेज / ग्रंथ मात्र रिजर्व बँकेचा पाया रचण्यासाठी वापरले जात होते. इतर देशात अर्थ व्यवस्था ढासळत असताना बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली वर आज सुद्धा भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) डौलाने उभी आहे.

भारतीय रिजर्व बँकेच्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे, हे विकिपीडिया या सोशल साईटने दिले आहे. परंतु बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती कुठेही नाही, ही शोकांतिका आहे.

आज याच द प्रॉब्लेम ऑफ द रूपी या महान ग्रंथाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपणा सर्वांना खूप अभिनंदनीय शुभेच्छा. हे वर्ष बाबासाहेब एक महान इकॉनॉमिस्ट म्हणून साजरं करूयात. हेच खरं अभिवादन असेल. आपण लवकरच साजरं करूयात.

Tags:    

Similar News