चवदार तळ्याच्या निमित्ताने ...

चवदार तळ्याची बंडखोरी कोकणातून सुरू झाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आक्रोशाला साथ दिली होती, पण आजही आक्रोश चालू आहे, हे डोळसपणे पाहिल्यावर कदाचीत दिसू शकेल, सांगत आहेत पंकज दळवी..

Update: 2022-03-20 04:41 GMT

चवदार तळे ही बंडखोरी कोकणातून सुरू झाली, यांत अनेक डॉ. बाबसाहेब आंबेडकरांसोबत बहुजन वर्गातील व सीकेपी समाजातील लोकं प्रामुख्याने होती, इथल्या प्रमुख जातीव्यवस्थेने पद्धतीशीरपणे याला महारांचा आंदोलन म्हणून संकुचित ठरवलं. सार्वजनिक पाणवठ्यावरील अधिकार बाबासाहेबांनी आजच्या दिवशी दलित आणि बहुजनवर्गाला मिळवून दिला, देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी मिळालेली ही सर्वांत मोठी घटना घडली रायगड जिल्ह्यांत. परिणाम स्वरूप स्वातंत्र्यानंतर देखिल इथे रुजलेली बंडखोरी खोती विरुद्ध उभी राहिली. खोती पद्धत बहुतांशी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आढळून येते. खोती मध्ये कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. खोती विरुद्ध कोकणातील १४ गावच्या(चरी अलिबाग) शेतकऱ्यांनी नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता यांत भाई चित्रे, सुरबा टिपणीस, शामराव परुळेकर अशी प्रमुख मंडळी सोबत होती. शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साथ दिली, शेतकऱ्यांच्या वर झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले. या जगातील सर्वात प्रदिर्घ काळ चाललेल्या संपपरिणाम म्हणजे १७ सप्टेंबर १९३७ रोजी डॉ बाबासाहेब यांनी खोती पद्धत नष्ट करण्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. अनेक भव्य मोर्चे यात नाशिक, सातारा अनेक जिल्ह्यातील शेतकरी सामील होते. खोती पद्धतीचा अंत झाल्याने १,२२,८६० एकर जमीन मुक्त झाली. पुढे कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ नुसार कसेल त्याची जमीन हे तत्व लागू करण्यात आले.




 


कोकणात घडलेल्या या दोन्ही घटना वेगळ्या असल्या तरी मी यांकडे पाहतांना एकतत्रीतपणे पाहतो. देश पारतंत्र्यात असतांना, कचेरीची काम करणारे बरेचसे खोतांपैकीचं होते अर्थात शिक्षणाचा अधिकार पण त्याचं मोजक्याच जातीच्या लोकांना सुरवातीला होता त्यामुळे अशांना सारा गोळा करणे, खोतीचा महसूल जमवणे ओघाने बरीचशी चंगळ आणि समृद्धी प्राप्त होती. सवर्णनां कडे लँडहोल्डिंग जास्त असल्याने बागायती भाग नदीकिनारी-नैसर्गिक पाणवठे असणाऱ्या भागांत वसवता ही यांनाच आली. बहुजनांच्या घामावर उभ्या राहिलेल्या बागांवर आजही प्रगतीचा लाभ हा वर्ग घेतो आहे, आता ही चुकी फक्त यावर्गाची नसून, बहुजनवर्गाची पण तितकीच आहे ही माझी धारणा आहे. चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर अवलंबित्व झुगारुण- मजुरीची कात टाकून बागायतदार बनायची धमक तितकी गवसलेली नाही, ही आजची शोकांतिका. तरीही, आज अनेक कित्येक मुंबईकर गावी बागायत लागवडीसाठी धडपत आहेत, पण सामायिक जागा-पाणी सिंचनाची गैरसोय, शासकीय योजनांचा योग्य लाभ घेण्याची उदासीनता, त्यात अशा प्रश्नांकडे पाहण्याची धोरत्मक निर्णय प्रक्रिया नसलेली कोकणातील राजकीय उदासीनता या गोष्टी आड येतातच. आजही खोती संपली असली तरी कित्येक कुळांना अधिकार त्यांचे मिळालेले नाहीत, कित्येक यांतील महसुली दावे प्रलंबीत आहेत. अलिबाग पासून खाली बांद्या पर्यंत आज ही नैसर्गिक स्रोत असलेले झरी, पाणवठे, नदीची पात्र यावर्गातल्या लोकांनी आपला वांवशिक अधिकार म्हणवून घेत, इतरांना नाकारला जातो, उदा. गुहागर या आमच्या तालुक्यातील वडद गाव घेता येईल, इथला नैसर्गिक पाणवठा स्थानिक अभिजन वर्गातले बागायतदार ग्रॅव्हीटीने बागा शिंपण्यासाठी वापरतात आणि खाली बहुजन वर्ग पिण्याच्या पाण्यासाठी तडफडतो, अशीच परिस्थिती दापोली-मंडणगड-गुहागर-दोडामार्ग इत्यादी तालुक्यात काहीं गावांमध्ये मी नोंदविली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आक्रोशाला साथ दिली होती, पण आजही आक्रोश चालू आहे, हे डोळसपणे पाहिल्यावर कदाचीत दिसू शकेल.


जय भीम !!

पंकज दळवी, गुहागर.

Tags:    

Similar News