Fact Check : राहुल गांधी यांनी 'काले किसान' म्हणत शेतकऱ्यांचा केला अवमान?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेत राहुल गांधी मोदी सरकारवर जोरदार टीका करताना पहायला मिळतात. मात्र या यात्रेत भाषण करत असताना राहुल गांधी यांची जीभ घसरली का? शेतकऱ्यांचा उल्लेख 'काला किसान' असा करून शेतकऱ्यांचा अवमान केला का? जाणून घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचे फॅक्ट चेक...

Update: 2023-01-25 15:09 GMT

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. या यात्रेत राहुल गांधी आपल्या भाषणातून मोदी (PM Modi) सरकार आणि RSS वर टीका करताना पहायला मिळत आहेत. त्यापार्श्वभुमीवर भाजपच्या IT cell चे प्रभारी अमित मालवीय (Amit Malviy) यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाची क्लीप ट्वीट (Rahul gandhi Tweet) केली आहे. यामध्ये जो काले किसान के खिलाफ तीन कानून आये थे, असं म्हणताना राहुल गांधी दिसत आहेत. या व्हिडीओ क्लीपच्यावर अमित मालवीय यांनी लिहीले आहे की, काळे शेतकरी, असं म्हणणं हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. राजस्थानपासून ते छत्तीसगड (Rajsthan to Chhattisgad) पर्यंत काँग्रेसने शेतकऱ्यांना वाईट दिवस आणून ठेवले आहेत.

भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar Tweet) यांनीही हाच व्हिडीओ ट्वीट करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. या ट्वीटमध्ये काले किसान, गोरा पप्पू अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) या ट्विटर अकाऊंटवरूनही हाच व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. त्यामध्ये काले किसान काय आहे? असा प्रश्न विचारला आहे.

डॉ. शलभ मनी त्रिपाठी यांनी ट्वीट करून मैंने राहुल गांधी को मार दिया, पांडवों की GST, ठंड से डरकर ठंड लगती है के बाद लेटेस्ट सुनिए काले किसान, असं म्हटलं आहे.

हे सगळे व्हिडीओ पाहत असतानाच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रिनाते यांचे ट्वीट पहायला मिळाले. त्यामध्ये त्यांनी भाजप नेते अमित मालवीय यांचे ट्वीट कोट केले होते. त्यामध्ये त्यांनी ही फेक न्यूज असल्याचे म्हटले. पुढे सुप्रिया श्रिनाते म्हणाल्या की, किती दिवस अर्धवट व्हिडीओ टाकणार? राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यासारखे टेलिप्रॉम्प्टर पाहत नाहीत, असं मत व्यक्त केले.

पुढे सुप्रिया श्रिनाते म्हणाल्या, ते काळे कायदे का आणले होते? ज्यामुळे 700 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले. कोण आहे त्यांच्या मृत्यूला जबाबदार? दम असेल तर पूर्ण व्हिडीओ ट्वीट करावा,असं आव्हान सुप्रिया श्रिनाते यांनी दिले. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने यातील फॅक्ट काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला.

पडताळणी (What is Fact):

मॅक्स महाराष्ट्रने राहुल गांधी यांच्या युट्यूब चॅननला भेट दिली. त्यामध्ये 18 जानेवारीला राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशमधील एक भाषण मिळाले. या भाषणानंतर 18 जानेवारीलाच भाजप नेत्यांनी ट्वीट केल्याचे दिसून आले.

भाषण सुरु होताच हिमाचल प्रदेशमधील नागरिकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल राहुल गांधी आभार मानले. त्यानंतर राहुल गांधी यांनी विविध सरकारी एजेंसीकडून न्यायपालिकेवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे माझ्यासमोर रस्त्यावर उतरणे हाच एकमेव मार्ग उरला होता, असं राहुल गांधी म्हणाले.

3 मिनिट 58 सेकंदाला राहुल गांधी यांनी संसदेत त्यांना बोलण्यापासून कसे रोखले जाते? याविषयी सांगितले आहे.

यानंतर पाच मिनिट 35 सेकंदाला राहुल गांधी म्हणाले की, जो काले किसान के खिलाफ कानून आए थे. तीन कानून... जो हर किसान समझ गया. उसके बारे में आपनें मीडिया में देखा? बिल्कूल नहीं. क्योंकी मीडिया अपको प्रधानमंत्री का चेहरा दिखाएगा, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर 5 मिनिट 35 सेकंदाला राहुल गांधी यांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं. यावेळी राहुल गांधी यांनी जो काले किसान, असा उल्लेख केला आहे. यामध्ये राहुल गांधी सरकारी एजेंसीचा गैरवापर, तीन कृषी कायदे ज्यांना विरोधकांकडून 'तीन काले कृषी कानून' म्हटलं जात होतं. त्याविषयी आणि मीडियाच्या भूमिकेविषयी राहूल गांधी बोलत होते. मात्र यामध्ये राहुल गांधी यांच्याकडून तीन काले कृषी कानून म्हणण्याऐवजी काले किसान अशी चूक झाल्याचं दिसून आलं.

काय आहे सत्य? What is Reality

राहुल गांधी हे हिमाचलमध्ये भाषण करत असताना त्यांच्याकडून काले किसान असे शब्द गेले होते. मात्र काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ एडीट करून फेक पध्दतीने पसरवल्याचा भाजप नेते अमित मालविय यांच्यावर केलेला आरोप चुकीचा असल्याचे दिसून आले.

Tags:    

Similar News