Shiv Jayanti 2026 : या शिवजयंतीला शिकण्याचे काही महत्वाचे धडे.

Update: 2026-02-19 06:29 GMT

Shivaji Maharaj शिवाजी महाराज सध्या चलनी नाणं झालेले आहेत. प्रत्येक टोळी त्यांना हायजॅक करू पाहतेय. कुणी परधर्मीय समुदायाला धाक दाखवायला, दहशत बसवायला त्यांच राज्य एकाच धर्माच होत अस दडपून सांगत. हिंदू धर्मात राजांना मर्यादित करू पाहणाऱ्या लोकांसाठी, समोर लढाईला उभ राहिलेली महिला पराभूत झाल्यावर तीच राज्य तिला परत करून तिच्या बाळाला मांडीवर बसवून दुध पाजणारे छत्रपती तुमचा आदर्श आहेत कि छत्रपती शिवाजी राजांचे स्वराज्य काकतालीय न्याय म्हणून त्यांनी शत्रूच्या स्त्रियांवर विजय मिळवल्यावर त्यांच्यावर अत्याचार करून बदला घ्यायला हवा होता म्हणणारा इसम तुमचा आदर्श आहे ?

हे दुतोंडी बोलण निदान शिवरायांच नाव घेताना शोभत नाही ना ?आज महाराज असते तर यांचा कडेलोट ठरलेला. कुणी शिवाजीराजांना एकाच जातीपुरत संकुचित आणि मर्यादित करून त्याच्या जीवावर सगळ्यांवर दादागिरी करायचा परवाना मिळाल्यागत वागत. या लोकांनी मावळे म्हणजे नेमके कोण ? मराठी रयत म्हणजे नेमक काय ? कुळवाडी म्हणजे नेमक काय, अठरापगड जाती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पगडी बांधणाऱ्या, चालीरीती, संस्कृती वेगळी असणाऱ्या जमाती आणि शेतकरी म्हणजे नेमक काय हेच आधी समजून घेण्याची गरज आहे.

तुम्ही राजांना जातीत जखडून ठेवू पाहता पण राजे तर आभाळाएवढे मोठे होते जिथे माणसांची पारख आणि कदर त्याचा हुनर पाहून होत होती, जात नव्हे. जन्म या अपघाताने कुठल्यातरी जातीत जन्माला आल्याने माज करणारे, स्वकर्तुत्व शून्य असताना बापजाद्यांनी केलेल्या पराक्रमाच्या कहाण्यावर पोट भरणारे लोक जर महाराजांच्या समोर उभे राहिले असते तर त्यांनी मुगल, आदिलशाही फौज बाजूला ठेवून आधी यांचा कडेलोट केला असता याची शंभर टक्के खात्री आहे. आणखी एक आचरटपणा म्हणजे त्यांना धर्मनिरपेक्ष वगैरे लेबल चिकटवणे. धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभाव या शब्दांचे नेमके अर्थ कळायला शिवचरित्र माहिती असायला हवं. छत्रपती हिंदू होते मात्र त्यांनी सगळ्या धर्माच्या लोकांना रयत म्हणून सारख्याच पद्धतीने वागवलं. त्यांच्यासाठी रयत फक्त रयत होती मग ती कुठल्याही धर्माची असो, त्यांनी दुसऱ्या धर्माचा तेवढाच आदर केला.

धर्मनिरपेक्ष म्हणजे भारताची आजची राज्यघटना जे तत्व सांगते ते, सरकारला, देशाला, प्रशासनाला स्वतःचा असा कुठलाही धर्म नाही, धर्म नागरिकांची खाजगी बाब आहे.

भारताच्या जनमानसात , होय भारताच्या जनमानसात हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे कारण डबक्यातल्या बेडकांना छत्रपती महाराष्ट्राचे वाटतात प्रत्यक्षात त्या काळात आणि नंतरही भारतातल्या अनेक राज्यात त्यांच्या प्रेरणेने लढे उभारले गेले, अश्या भारतीय जनमानसात सर्वाना सोबत घेऊन चालणारा लोककल्याणकारी राजा अशी महाराजांची प्रतिमा आहे म्हणून एवढ्या मोठ्या राजाला तत्कालीन रयत प्रेमाने शिवबा म्हणायची. डबक्यात उडी मारून दमणाऱ्या बेडकांना हे ठाऊकच नाही हा राजा महासागर होता ते.

अश्या युगपुरुषाला धर्मात जातीत संकुचित करून ठेवण्याचा करंटेपणा करणाऱ्या लोकांच्या नशिबी महाराजांनी कडेलोट लिहिला असता ते एवढ्याचसाठी.

आनंद शितोळे

Shiv Jayanti, Shivaji Maharaj, Nation-Building, Leadership, Secularism, Sarvadharma Sambhav

Similar News