#Lockdownyatra : आम्ही कुणाकडे जायचे, चीन की पाकिस्तान? तमाशा कलावंतांचा सरकारला सवाल

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे दुःख मांडण्यासाठी मायबाप सरकार सोडून आम्ही कोणाकडे जायचं? चीन की पाकिस्तान, असा उद्विग्न सवाल तमाशा कलावंतांनी विचारला आहे.

Update: 2022-01-22 13:25 GMT

गेल्या दोन वर्षांपासून लोककलावंत तमाशापासून दुरावला आहे. मात्र कोरोना आटोक्यात आला तरी तमाशाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर तमाशाचे फडही सुरू करण्याची मागणी तमाशा कलावंतांनी केली आहे. तर येत्या दोन फेब्रुवारी पर्यंत तमाशाचे फड सुरू करण्यास परवानगी न दिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर तमाशा कलावंत सामुहिकरित्या आत्मदहन करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी दिला. ते पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी खेडकर म्हणाले, देशभर सगळं काही सुरू आहे. पण तमाशा मात्र बंद आहे. तर कोरोना संकटाचा परिणाम उद्योग, व्यवसाय यांच्यासह तमाशा कलावंतांवरही झाला. त्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वर्षांपासून तमाशा सुरू नाही. प्रशासनाकडून तमाशा कलावंतांना कायम सावत्र वागणूक दिली जात आहे. तर आमची व्यथा आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यापर्यंत पोहचवली आहे. मात्र आमच्या मागणीवर अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. देशात सिनेमागृह, नाट्यगृह, सभा 50 टक्के क्षमतेने चालू मग तमाशा का नाही? असा सवाल खेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.

सरकार आमचे मायबाप आहे. आम्ही सरकार सोडून कोणाकडे जायचे? चीन की पाकिस्तान असा उद्विग्न सवाल रघुवीर खेडकर यांनी उपस्थित केला.

Tags:    

Similar News