जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा, तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक

देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील महत्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळाप्रकरणी तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Update: 2022-02-18 02:31 GMT

देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. तर भाजपकडून घोडाळ्याचे आरोप फेटाळले आहेत. त्यापार्श्वभुमीवर बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळाप्रकरणी प्रशासनाने कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महत्वकांक्षी योजना ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात येत होते. तसेच याचा जमीनीतील पाणीपातळी वाढण्यासाठी उपयोग झाला नसल्याचे ताशेरे कॅगने ओढले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या योजनेतील घोटाळ्याचा तपास करण्यासाठी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान बीड जिल्ह्यात 2017-18 या वर्षात झालेल्या जलयुक्त शिवार कामांमध्ये मोठी अनियमितता आढळून आली होती. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये दोन कोटी 41 लाखांचा अपहार झाल्याची नोंद परळी शहर पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे याप्रकरणातील आरोपींचा शोध पोलिस घेत होते.

अखेर पाच वर्षांपासून फरार असलेल्या तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना गुन्हे शाखेच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अटक केली आहे. बीडच्या परळी शहारत ही कारवाई करण्यात आली असून पकडलेल्या तिघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या कामांची पाच पथकामार्फत चौकशी करण्यात आली होती. पथकाने 15 टक्के कामाची निवड तपासणी केली असता एकूण 815 कामांपैकी 123 कामे निवडण्यात आली त्यातील 103 कामांची तपासणी झाली असून त्यातील 95 कामांमध्ये अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. 


Tags:    

Similar News