फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे

Update: 2020-02-17 03:13 GMT

अंधारात कारस्थानाने शपथ घेणारे फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहेत, अशी टीका काॅंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय. हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा, या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानाला सावंत यांनी उत्तर दिलंय.

https://twitter.com/sachin_inc/status/1229054553082908672?s=19

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. अधुनमधून उद्धव ठाकरे यांना चुचकारण्याचेही प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. कधी सावरकरांचा मुद्दा पुढे करून तर कधी हिंदुत्वाशी निष्ठेवरून शिवसेनेची कोंडी करण्याचीही संधी भाजपा सोडत नाहीये. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आमचं सरकार पाडून दाखवा, असं खुलं आव्हान त्यांनी भाजपाला दिलं.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रतिआव्हान दिलं आहे. सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या, असं फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात बोलत होते.

हाच संदर्भ पकडून सचिन सावंत यांनी ट्वीट केलंय. " विरोधी पक्षनेत्यांचे 'हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवा' विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकलणाऱ्यांना पुन्हा निवडणूक परवडणार नाही ही जाणीव नाही. निवडणूक हा खेळ वाटला का?अंधारात कारस्थानाने शपथ घेणारे फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहे." अशा शब्दांत सचिन सावंतांनी भाजपावर विशेषतः फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

Similar News