'गावागावात म्हणू लागलीय पारू, माझ्या नवऱ्याने सोडलीय दारू!'

Update: 2020-04-26 11:43 GMT

महसुलाच्या हव्यासापायी दारूची दुकानं सुरू करणं उचित नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. लॉकडाऊन काळात दारुवरून राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारचा महसूल वाढवण्यासाठी राज्यातील वाईन शॉप्स सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

'गावागावात म्हणू लागलीय पारू, माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू' अशी कविता करत आठवले यांनी आपल्या अंदाजात या विषयावर प्रतिक्रिया दिली. लॉकडाऊन काळात दारूची दुकानं बंद असल्याने अनेकांची दारू बंद झाली आहे. दारूमुळे उद्धवस्त होणारे संसार सुरळीत सुरु आहेत. यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे केवळ महसूल मिळेल म्हणून दारूची दुकानं सुरू करणं हे या महिलांवर अन्याय करणारं ठरेल. म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही दुकानांना सुरू करण्याची परवानगी देऊ नये असं आठवले यांनी म्हटलंय.

Similar News