ही आहे मुंबईची दुसरी बाजू !

Update: 2020-02-13 11:56 GMT

देशाची आर्थिक राजधानी मुंबई...रोज हजारो लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी इथं येत असतात. पण अनेकांना रोजगार देणाऱ्या या मुंबईची आणखी एक बाजू आहे जी अजिबातच भूषणावह नाही. मुंबईतल्या अनेक भागात नागरिकांना मलभूत सोयीसुविधाच मिळत नसल्याची ओरड आजही कायम आहे. असा एक भाग आहे कुर्ल्यामधील जयशंकरनगर पाईपलाईनचा भाग..

जयशंकर पाईपलाईन या भागात सुमारे 4000 लोकसंख्या असलेली झोपटपट्टी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या दरवाजासमोर आणि घराघरात शौचालयाचं पाणी शिरत असल्याची तक्रारी इथले नागरिक महापालिकेकडे करत आहे. मात्र महापालिकेनं यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली दिसत नाहीत. केवळ एवढ्यावरच इथल्या नागरिकांचे हाल थांबत नाहीत. या भागात गटारंही तुंबलेली आहेत. यामुळे रोगराई वाढण्यास सुरूवात झाल्याचे इथले नागरिक सांगतायत. स्थानिक नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी प्यावं लागत आहे. मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधीने जेव्हा या भागाची पाहणी केली तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

Full View

स्वच्छ मुंबई आणि सुंदर मुंबई म्हणणाऱ्या महानगरपालिकेच्या या भागातील शौचायलयांची अवस्था महापालिकेचे सर्व दावे फोल ठरवते आहे. शौचालयाचं पाणी तुंबून सतत दुर्गंधी पसरत आहे. रस्त्याच्या कडेला कचरा पडून आहे. इथले स्थानिक नागरिक 2017 पासून महानगर पालिकेच्या कुर्ल्यातील एल वॉर्ड विभागात तक्रारी करत आहेत. आम्ही या संदर्भात सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज यांना 2017पासून नागरिक तक्रारी करत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे सरकारी उत्तर देत, त्यांच्या तक्रारींचं निवारण केले आहे आणि पुन्हा तक्रारी आल्यास त्या सोडवू असं सांगितले.

या भागातले लोकप्रतिनिधी नगरसेवक, आमदार आमच्या समस्या आणि अडचणींकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोपही या नागरिकांनी केला आहे. आमच्या समस्या घेऊन आम्ही शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस हे यांच्याकडे गेलो तर शिवसैनिक असल्याचे आयडी मागतात, असा आरोपही या नागरिकांनी केला. आम्ही संजय पोतनीस यांना यासंदर्भात विचारले तेव्हा त्यांनी हे आरोप खोटे असून राजकीय हेतून केल्याचं म्हंलयं. तर काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक अशरफ आझमी यांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

एकूणच काय तर मुंबईची ही दुसरी बाजू खूपच अस्वस्थ करणारी आहे. ना महापालिका मदत करतेय ना लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्यांची दखल घेत आहेत, त्यामुळे आमचा नेमका दोष काय आहे असा सवाल इथले नागरिक करत आहेत.

Similar News