विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पूरग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढ झाल्याची टीका त्यांनी केली आहे. अजित पवार यांनी गुरूवारी गडचिरोलीपासून आपल्या दौऱ्याला सुरूवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांशी त्यांनी संवादही साधला. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गडचिरोलीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीदेखील अजित पवार यांनी केली आहे. याचवेळी अजित पवार यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन जोरदार टीका केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे दौरे केले असले तरी अजूनही पंचनामे झालेले नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली; त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावी. pic.twitter.com/yCq4Szubsn
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 28, 2022
मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून काम करणे वेगळे आणि मंत्री नेमून त्यांना ३७ जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी देणे, तसेच त्यांना तिथे ठाण मांडून बसायला लावणे यात फरक आहे, असा टोला देखील अजित पवार यांनी लगावला. तसेच मंत्रिमंडळ विस्तार केला नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे, असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.