दुर्दैवी! मांजरामुळे गेला दीड वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

Update: 2021-12-08 10:40 GMT

नागपूर : मांजराने शेतकरी कुटुंबातील एका चिमुकल्याचा जीव घेतल्याची धक्कदायक घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.अजय पाटील हे शेतकरी समतानगर मलका कॉलनीत राहतात. शेतात फवारणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अजय पाटील यांनी घरात किटकनाशक आणून ठेवले होते. त्यांनी कीटकनाशकाचा डबा कपाटावर ठेवला होता.

सोमवारी दुपारी अजय पाटील घराबाहेर होते तर त्यांची पत्नी घरकामात व्यस्त होती. दरम्यान दीड वर्षांचा त्यांचा मुलगा रियांश घरात खेळत असताना कपाटावर चढलेल्या मांजराने कीटकनाशकाचा डबा खाली पाडला. त्यामुळे विष घरात पसरले. खाली खेळत असलेल्या रियांशने विषाने माखलेले तेच हात तोंडात घातले आणि त्याला विषबाधा झाली.

काही वेळाने रियांशची आई घरामध्ये आली तेंव्हा त्यांनी चिमुकल्याला उचलून त्याचे हात धुतले, आंघोळही घातली मात्र, काही वेळानंतर विषाने आपला प्रभाव दाखवला. चिमुकल्याची प्रकृती बिघडल्याने सुरुवातीला त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेने समतानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:    

Similar News