औरंगाबाद शहरातील काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पण राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने आता यावरुन भाजपला जबाबदार धरत मोर्चा काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचे आमदार अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला. पण अतुल सावे यांच्या कार्यालयाला कुलूप असल्याने हा मोर्चा पुंडलिक नगर परिसरातील पाण्याच्या टाकीवर नेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरातील पाणी पुरेसं अत्यंत गंभीर होत चालला असून पुंडलिक नगर परिसर, हनुमान नगर परिसर या ठिकाणी भाजपाचे आमदार अतुल सावे हे आमदार म्हणून निवडून आलेले असूनही दहा वर्षापासून त्यांनी ही पाणी समस्या सोडवली नाही, असा आरोप करत राष्ट्रवादीने हा मोर्चा काढला. तसेच अतुल साव घाबरल्याने त्यांनी संपर्क कार्यालयाला कुलूप लावून पळ काढल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. पण सावे यांनी हा आरोप फेटाळला आहे. पाणीटंचाईने जनता त्रस्त असताना आता मात्र राजकाऱण्यांनी या पाण्याचेही राजकारण सुरू केल्याचे दिसते आहे.