एसटी कर्मचाऱ्यांचा संप, शरद पवार यांची मध्यस्थी

Update: 2022-01-10 10:17 GMT

गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हस्तक्षेप केला आहे, त्यामुळे संप मिटण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मागणी सोडून सरकारने उर्वरित सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या. पण विलीनीकरणावर ठाम राहत कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला होता. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि कर्मचाऱ्यांच्या कृती समितीमध्ये चर्चा झाली. एसटीची बांधिलकी जनतेशी आहे, त्यामुळे एसटी सुरू झाली पाहिजे, यावर सगळ्यांचे एकमत झाले असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.

गेलाया दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यात कोरोनाचे संकट पुन्हा आले आहे. याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. पण एसटी कर्माचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्र्यांना जेवढे शक्य आहे तेवढे केले पण सरकारच्या निर्णयामधील कमतरता कृती समितीने समोर आणल्याने त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग निघू शकतो पण आझी एसटी सुरू झाली पाहिजे, असे आवाहन अनिल परब यांनी केले. शरद पवार यांनी देखील कृती समितीने प्रवाशांचा विचार करुन एसटी सुरू केली पाहिजे असे आवाहन केले.

Similar News