मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय ; 31 जानेवारीपर्यंत शाळा बंद

Update: 2022-01-03 11:29 GMT

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत पहिली ते नववीच्या शाळा बंद राहणार आहेत. इयत्ता 10 आणि बारावीचे वर्ग सुरू असणार आहेत. अकरावीचे वर्ग देखील बंद असणार आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ प्रचंड वाढली असून, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ होत असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र, पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत.

आजच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचाही आढावा घेतला होता. आजपासून लहान मुलांचं लसीकरणाला सुरुवात झाली आहे. एकीकडे मुंबईत शाळांबाबत जो निर्णय घेण्यात आला आहे, तशाप्रकारचा निर्णय राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शाळांबाबत घेतला जातो का? याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय.

Tags:    

Similar News