उठसूट धाडी टाकणे हा दिल्लीतील राज्यकर्त्यांचा नवा व्यवसाय- खा. संजय राऊत

Update: 2021-10-17 02:30 GMT

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या धाडसत्रावरून सामनाचा रोखठोकमधून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. आपले पंतप्रधान लोकशाही मानतात असे गृहमंत्री अमित शाह यांना सांगावे लागले. कारण हिंदुस्थानात लोकशाही उरली आहे का ? हा प्रश्न संपूर्ण जगालाच पडला आहे व अमित शाह यांच्या काही दिवसांपूर्वी केलेल्या 'अशिक्षित हे देशावरील ओझे आहेत' या वक्तव्याचा आधार घेत,'अशिक्षितांच्या हाती लोकशाही देश गेल्याची किंमत आपण मोजतो आहोत' हे शाह यांनी मान्य केले असा घणाघात सामनाच्या रोखठोकमधून खा. संजय राऊत यांनी केला आहे.

'तुला काय धाड भरली आहे ?' अशा एका गंमतीशीर वाक्प्रचाराचा अनुभव सध्या महाराष्ट्र राज्य घेत आहे, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की धाडीचे? असा प्रश्न पडावा इतक्या विक्रमी धाडी केंद्रीय तपास यंत्रणांकडून पडताना दिसत आहे. असं सामनातून म्हटले आहे.

थापा मारणे हा दिल्लीतील राज्यकर्त्यांचा उद्योग होताच आता उठसूट धाडी टाकणे हा नवा व्यवसाय त्याला जोडून घेतला आहे अशी जळजळीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून केली आहे. सोबतच त्यांनी म्हटलं आहे की, हा बिनभांडवली धंदा आहे पैसा जनतेचा यंत्रणा सरकारी आणि त्यातून विरोधकांचा काटा काढायचा.

दरम्यान मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत भाष्य करताना सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत म्हणाले की, नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे आठ महिने तुरुंगात खितपत पडले. त्यांना जामीनही मिळू दिला नाही मलिक यांची आणि त्यांच्या कुटुंबाची यथेच्छ बदनामी केली ती वेगळीच. NCB म्हणजे केंद्र अमली पदार्थ विरोधी पथकाचे लोक मुंबईत पथारी पसरून बसले आहेत आणि अनेक खोटी प्रकरणे उघडून मनस्ताप देत आहेत.

Tags:    

Similar News