औरंगाबाद: शहरात जमावबंदीचे आदेश असतानाही औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे कार्यकर्त्यांना जमा करून जल्लोष केल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जलील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री म्हणजेच बुधवारपासून लॉकडाऊन लागणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले होते. मात्र याला विरोध करत खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
एकीकडे राजकीय दबाव तर दुसरीकडे मुंबईतून आलेल्या सूचना यामुळे जिल्हाधिकारी यांनी रात्री 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनला स्थगिती दिल्याची घोषणा केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या घोषणेनंतर जलील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर गर्दी करत जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जलील यांनी विना मास्क आणि कोरोनाचे सर्व नियम पायी तुडवत जल्लोषात सहभाग घेतला. यामुळे जमावबंदी आदेशाच उल्लंघन झालं असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भाजपचं आंदोलन
खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला होता.