Maharashtra political Crisis : सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मंगळवारी ही सुनावणी होणार होती. मात्र पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Update: 2022-11-29 02:44 GMT

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 1 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटांना 27 नोव्हेंबरपर्यंत लिखीत मुद्दे सादर करण्यास सांगितले होते. मात्र 27 नोव्हेंबर रोजी ही सुनावणी होऊ शकली नव्हती. ती सुनावणी मंगळवारी घेण्यात येणार होती. मात्र पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र हे प्रकरण मंगळवारच्या कामकाजाच्या वेळापत्रकामध्ये नव्हते. त्यामुळे हे प्रकरण ऐनवेळी यादीत घेतले जाईल, असं मत व्यक्त केलं जात होतं. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना आपलं म्हणणं लेखी मांडण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे ठाकरे आणि शिंदे गट आपली बाजू मांडणार होते. मात्र ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

याआधी झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरु असतानाच निवडणूक आयोगाची प्रक्रीया सुरु ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार 27 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर 1 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षकारांनी चार आठवड्यात लेखी मुद्दे मांडावेत, ज्यामुळे निकाल लिहीणे सोपे जाईल, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडणार आहेत. याबरोबरच केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता बाजू मांडत आहेत. मात्र न्यायमुर्ती कृष्ण मुरारी हे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात उपलब्ध असणार नाहीत. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र ही सुनावणी नेमकी कधी होणार? हे अजून स्पष्ट झाले नाही.

मंगळवारी घटनापीठ कोणता निर्णय देणार होते?

Supreme Court मध्ये सुरु असलेल्या सर्व घटनात्मक मुद्द्यासंदर्भात सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एक वेळापत्रक ठरवून देण्याची शक्यता होती. ज्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकर निर्णय देणे शक्य होऊ शकेल.

पाच न्यायमुर्तींचे घटनापीठ

  • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
  • न्यायमूर्ती एम आर शहा
  • न्यायमूर्ती कृष्ण मुरारी
  • न्यायमूर्तीपी नरसिंह
  • न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी करणाऱ्या पाच सदस्यीय घटनापीठामध्ये समावेश आहे.

Tags:    

Similar News