शहीद शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधानांचे धक्कादायक वक्तव्य, मोदींशी भांडण झाल्याचा सत्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट

Update: 2022-01-03 05:08 GMT

शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाच्या (farmer agitation) रेट्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी माघार घेत कृष कायदे (farm laws)रद्द केले. पण आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल नरेंद्र मोदी यांचे मत किती प्रतिकूल होते, याचा दावा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (satyapal malik) यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर (bjp) सातत्याने टीका करणाऱ्या सत्यपाल मलिक यांनी रविवारी मोठा गौप्यस्फोट केला.

रविवारी हरयाणामधील दादरीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मलिक यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली, त्याचबरोबर पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप देखील केला. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलना संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती, अशी माहिती मलिक यांनी दिली. पण आपण त्यांना भेटलो तेव्हा त्यांना प्रचंड अहंकार असल्याचे जाणवले. यावेळी आपले नरेंद्र मोदी यांच्याशी भांडण देखील झाले, अशी माहितीही मलिक यांनी दिली आहे.

"मी जेव्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात पंतप्रधान मोदींना भेटलो, तेव्हा पाचच मिनिटांत आपले त्यांच्याशी भांडण झाले. ते प्रचंड गर्विष्ठ असल्याचे दिसले, ज्यावेळी मी त्यांना सांगितले की आपले ५०० लोक मेले आहेत, त्यावर ते लोक माझ्यासाठी मेले आहेत का?" असा सवाल मोदींनी विचारल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. "हो ते तुमच्यासाठीच मेले आहेत कारण तुम्ही राजे बनला आहात," असे आपण त्यांना सुनावल्याचे मलिक यांनी सांगितले. त्यानंतर आपले त्यांच्याशी भांडण झाले आणि मोदी यांना आपल्याला अमित शाह (amit shah) यांना भेटण्यास सांगितले, त्यानंतर आपण अमित शाह यांची भेट घेतली, अशीही माहिती मलिक यांनी दिली आहे.

मलिक यांच्या दाव्यावर भाजपतर्फे कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गेल्या काही दिवसात सत्यपाल मलिक यांनी वारंवार पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. एवढेच नाही तर आपण सातत्याने मोदींविरोधात बोलत असल्याने आपल्याला दिल्लीतून कधीही फोन येऊ शकतो, असे वाटत असल्याचेही वक्तव्य त्यांनी य़ाआधी केले आहे.

Similar News