निवृत्त झालेले पोलीस आणि दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुबांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बी.डी.डी. चाळींमध्ये पोलीस विभागामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांना जी घरं राहण्यासाठी दिलेली आहेत ती तातडीने रिकामी करून दिली जावी, तसेच निवृत्त पोलीस कर्मचारी तसेच दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये कायमस्वरूपी घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याकरीता उपायोजना सुचविण्यासाठी तसेच याबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या समितीचे सहअध्यक्ष असतील तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव, सह पोलीस आयुक्त , मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी, हे या समितीचे सदस्य असतील.
मुंबईतील वरळी, नायगांव, ना. म. जोशी मार्ग, शिवडी येथील बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास लवकर करता यावा यादृष्टीने आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती, या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्देश दिले होते.त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.