रेल्वे तिकीट द्या अन्यथा रुळावरून उतरून तीव्र आंदोलन करण्याचा आरपीआयचा इशारा
कल्याण : रेल्वे तिकीट द्या नाहीतर रुळावरून उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा आरपीआय युवक आघाडीच्या वतीने देण्यात आला. मुंबईसह उपनगरामध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी लोकल ट्रेन जीवनवाहिनी आहे.मात्र कोरोनामुळे लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होती. त्यामुळे अनेक लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर सरकारने 2 डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेचा पास घेण्यास परवानगी दिली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे तिकीट मिळत होते, मात्र अचानक त्यांना देखील तिकीट देणं बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा देत रेल्वे तिकीट द्यावे अशी मागणी करत आरपीआय कार्यकर्त्यांनी कल्याण स्टेशनवर घोषणाबाजी करत निवेदन दिले. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने या निवेदनवर विचार केला नाही तर रेल्वे रुळावरून उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशाराही आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाकार्याध्यक्ष भारत सोनवणे व शहराध्यक्ष संतोष जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते शेखर केदारे यांनी दिला आहे.