कोस्टल रोड मुंबई महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मरीन ड्राईव्ह ते बोरीवलीला जोडणारा हा प्रकल्प २९.०२ किमी लांबीचा असणार आहे. मात्र, कोस्टल रोडचं काम उच्च न्यायालयानं जुलैमध्ये दिलेल्या आदेशानंतर रखडलं होतं. उच्च न्यायालयात या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याची याचिका दाखल करण्यात आली होती. जुलैमध्ये या याचिकांवर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं कोस्टल रोडच्या कामाला स्थगिती दिली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने पालिकेची मागणी मान्य करण्यास नकार दिला होता.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकाराची हानी पोहचणार नसल्याची भूमिका महापालिकेनं न्यायालयात मांडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं कामावरील स्थगिती हटवली. या प्रकल्पाच काम परत सुरू होऊ शकतं यामुळे किनारपट्टीवरील मच्छिमार चिंतेत आहेत. कारण ज्या ठिकाणी मच्छी मिळते त्या ठिकाणाहून हा मार्ग गेला असल्यामुळे मच्छिमार व्यवसाय बंद होणार अशी भिती या लोकांमध्ये तयार झाली आहे. यासंदर्भात जाणून घेतलं येथील नागरीकांकडून पाहा हा व्हिडीओ..