#EconomicSurvey देशाचे आर्थिक चित्र स्पष्ट होणार ; आज येणार आर्थिक पाहणी अहवाल

Update: 2023-01-31 07:27 GMT

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचे पुर्ण बजेट सादर होणारे संसदेचे बजेट आधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती दौपदी मुर्मू संबोधित केले असून आता २०२२-२३ आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री ते सादर करतील. त्यानंतर लगेचच मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन पत्रकार परीषद घेणार आहे.

Economic Survey साठी मुख्य आर्थिक सल्लागार समितीच्या नेतृत्त्वाखाली बजेटपूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार केला जातो. या समितीचे अध्यक्ष अनंत नागेश्वर यांच्या समवेत अर्थतज्ज्ञांची एक टीम कार्यरत असते.अर्थव्यवस्थेची स्थिती देण्यासाठी आणि धोरणांसंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी बजेटच्या आधी संसदेत आर्थिक आढावा आणि सर्वेक्षण सादर केली जाते. आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला जातो. याद्वारे सरकार योजनांची स्थिती, संपूर्ण वर्षभरातील विकासाचा कल, कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक झाली याची माहिती दिली जाते. बजेटच्या आधी एक दिवस जाहीर होणाऱ्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात सर्वांची नजर प्रामुख्याने जीडीपीच्या आकडेवारीवर असते.

अधिवेशनापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज जगात ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यामध्ये सर्वांच्या नजरा भारताच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. त्यांनी म्हटले की मला आशा आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अपेक्षा पूर्ण करतील. "अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये, भारताचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, जगाला दिसणारा आशेचा किरण अधिक उजळत आहे. यासाठी निर्मला सीतारामन या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असा माझा ठाम विश्वास आहे." संपूर्ण जग भारताकडे ज्या दृष्टीकोनाने पाहत आहे ते आम्ही पूर्ण करू, असेही पंतप्रधान म्हणाले.

संयुक्त सभागृहात अभिभाषण करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणा्या की, "भारतात मोठं डिजीटल नेटवर्क तयार झालं आहे. त्याचबरोबर देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळत आहे. भारत हा देश मोठी अर्थ्यव्यवस्था म्हणून पुढे आहे. या सरकारने विकासाचा पाया घातला आहे." केंद्रातल्या मोदी सरकारचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. त्या म्हणाल्या की, "भारतात एक स्थिर, निडर आणि निर्णायक सरकार कार्यरत आहे. हे सरकार इमानदार लोकांचा सन्मान करणारं आहे. त्याचबरोबर आधुनिकतेला चालना देणारं सरकार आहे."

त्यापुढे म्हणाल्या,"आयुष्मान भारत योजनेने देशातील कोट्यवधी गरीबांचं कल्याण केलं आहे. आगामी काळात एकही गरीब व्यक्ती नसलेला देश बनणं हेच आपलं ध्येय असेल. भारत वैश्विक स्तरावर एक बलवान राष्ट्र बनू लागला आहे. आपल्या जागतिक भूमिका आत्मविश्वासाने पुढे नेणारं सरकार देशाला लाभलं आहे. त्याचबरोबर देशात आपली भ्रष्टाचारासोबत निरंतर लढाई सुरू आहे, देशात भ्रष्टाचाराचं उच्चाटन सुरू आहे. जगाला हेवा वाटेल अशी वाटचाल देश करत आहे." आम आदमी पक्षाने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला असून अनेक कॉंग्रेसनेते भारत जोडोसाठी श्रीनगरमधे होते.

इथे लाईव्ह पहा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल

सर्वसामान्यांना आर्थिक सर्वेक्षण अहवाल लाईव्ह पाहता येणार आहे. याचे लाईव्ह स्ट्रिमिंग सर्वच न्यूज चॅनेल्सवर पाहता येईल. पण त्याशिवाय संसद टीव्ही, पीआयबी इंडिया आदीवर केले जाईल. तुम्हाला हे सर्वेक्षण पहायचे असेल तर https://www.youtube.com/@pibindia/videos केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या फेसबूक पेजवर https://www.facebook.com/finmin.goi ट्विटर लाईव्ह अपडेट https://twitter.com/FinMinIndia वर पाहता येईल.

Tags:    

Similar News