कसारा-उंबरमाळी दरम्यान ट्रॅक पाण्याखाली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Update: 2021-07-22 03:37 GMT

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे गुरूवारी सकाळी देखील मुंबईतील काही भागात पाणी साचले होते. तर कसारा- उंबरमाळी दरम्यान मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे यी दोन्ही स्टेशन दरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. तसेच पावससामुळे इगरपुरी ते खर्डी दरम्यानची रेल्वे वाहतूकही काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.

मुंबईतही मुसळधार पावसामुळे सकाळी ईस्टर्न फ्री वे, मालाड, जोगेश्वरी, विलेपार्ले, वांद्रे या भागात वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे, रागयड आणि पालघर जिल्ह्यांध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने बुधवारी वर्तवला होता. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ऑरेंज एलर्ट तर मुंबईत यलो एलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले होते.

इगतपुरी शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक लोकांच्या दुकानात व घरात पाणी शिरले.

Similar News