छत्रपती शिवाजी महाराज यांनी युध्दामध्ये काही नियम आपल्या सैनिकांना घालून दिले होते. ते म्हणजे शत्रू पक्षाच्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार करायचे नाही. दुसऱ्याच्या धर्माचा आदर करायचा. म्हणूनच आजही त्यांच्याकडे जगातील एक आदर्श राजा म्हणून पाहिले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात स्त्रियांबाबत किती आदर होता? हे सांगण्यासाठी इतिहासकार कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं आवर्जून उल्लेख करतात. मात्र, या कृतीला सावरकर 'सद्गुण विकृती' असं संबोधतात.
अलीकडे राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत दिल्लीच्या एका सभेत वक्तव्य केले होते. त्यानंतर सावरकरांबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवण्या संदर्भात नक्की काय म्हंटलं आहे?
“शत्रू स्त्री दाक्षिण्यासारखी राष्ट्रविघातक आणि कुपात्री योजिलेल्या प्रकारांमध्ये सहस्त्रावधि उदाहरणांपैकी दोन ठळक उदाहरणे येथे दिल्यास ते अप्रस्तुत होणार नाही. छत्रपति शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सालंकृत तिच्या नवऱ्याकडे पाठवले आणि पोर्तुगीजाचा पाडाव झालेल्या शत्रूस्त्रीसही चिमाजी अप्पाने वरील प्रकारे गौरवून तिच्या पतीकडे परत पाठवले.
या दोन गोष्टींचा गौरवास्पद उल्लेख आजही आपण शेकडोवेळी मोठ्या अभिमानाने करीत असतो. पण शिवाजी महाराजांना किंवा चिमाजी अप्पांना महंमद गझनी, घोरी, अलाउद्दीन खिलजी इत्यादी मुसलमानी सुलतानांनी दाहीरच्या राजकन्या, कर्णावतीच्या कर्णराजाची कमलदेवी नि तिची स्वरुपसुंदर मुलगी देवलदेवी इत्यादी सहस्रावधी हिंदू राजकारण्यांवर केलेले बलात्कार आणि लक्षावधी हिंदू स्त्रियांची केलेली विटंबना यांची आठवण, पाडाव झालेल्या मुस्लिम स्त्रियांचा गौरव करताना झाली नाही.