सर्वात जास्त त्रास राजकीय भोंग्यांचा होतो, बच्चू कडू यांचा टोला कुणाला?

Update: 2022-05-04 14:04 GMT

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरून राजकारण पेटले आहे. त्यातच राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भोंग्यांच्या वादावर प्रतिक्रीया दिली आहे. मात्र यानंतर बच्चू कडूंचा निशाणा कुणावर? असा सवाल विचारला जात आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यात भोंगा हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तर याच भोंग्यावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. त्यातच दररोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या नेत्यांनाही सामान्य लोक खोचकपणे राजकीय भोंगा म्हणतात. त्यामुळे बच्चू कडूंना भोंग्यांवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना बच्चू कडू म्हणाले, मंदिर—मशीदीवरील भोंगे बंद कराल तर सर्वच भोंगे बंद करावे लागतील.

बच्चू कडू यांनी याआधीही राजकीय भोंगे बंद करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यामुळे दररोज पत्रकार परिषद घेणारे किरीट सोमय्या, संजय राऊत यांच्यासह राज ठाकरे यांनाही सोशल मीडियावर राजकीय भोंगे असं म्हटलं जातं. त्यामुळे बच्चू कडू यांचा नेमका निशाणा कोणावर असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांनी भोंग्यावरून दिलेल्या अल्टीमेटमला राज्यातील जनतेने नाकारले आहे. त्यामुळे भोंगे बंद करायचे असतील तर आधी राजकारणी लोकांनी आपले भोंगे बंद केले पाहिजेत. तर मी सुध्दा माझे भोंगे बंद करणार आहे. मी निवडणूकीत फक्त एकच दिवस लोकांना चिन्ह माहित होण्यासाठी भोंगा लावणार आहे. बाकी सभेला भोंगा लावला जाईल, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली.

सर्वात जास्त त्रास राजकीय भोंग्यांचा होतो, बच्चू कडू यांचा टोला कुणाला?

राज ठाकरे यांनी 2 एप्रिल रोजी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. तर 12 एप्रिलच्या सभेत बोलताना 3 मेचा अल्टीमेटम दिला होता. त्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी 1 मे रोजी घेतलेल्या सभेत अत्यंत प्रक्षोभक भाषण करत भोंग्यावरून 4 मे रोजी राज्यातील मशिदीवर भोंगे वाजले तर त्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे अखेर राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर दिवसभरात मनसे कार्यकर्त्यांनी मशीदीसमोर हनुमान चालीसा पठन करण्याचा केलेला प्रयत्न, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून मांडलेली भुमिका आणि काही ठिकाणी मशीदीवर न वाजवलेले भोंगे यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहचवण्याचा प्रयत्न होत असताना पोलिसांनी हा सगळा प्रकार हाणून पाडला. तर या प्रकारावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया देतांना जणू काय एखादा पहाड उपटून फेकतील असे वातावरण निर्माण केले जात होते. मात्र तसा कोणताही प्रकार घडला नसल्याची प्रतिक्रीया दिली. मात्र यावेळी राजकीय भोंगे बंद झाले पाहिजेत, असा खोचक टोला लगावला. पण हा टोला नेमका कोणाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags:    

Similar News