कोरोना व्हायरस : राज्य सरकार दररोज एक लाख लोकांना जेवन देणार

Update: 2020-03-29 08:08 GMT

कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर राज्यातील गरजू, गोरगरीब, शेतकरी, कामगार व मजूर वर्गाला मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोना व्हायरस च्या निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत आहे.

राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे.शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये. या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कष्टकरी,असंघटित कामगार, स्थलांतरित,बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्यात येत असून तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत विलंब न करता जिल्हाधिकारी आणि नियंत्रक शिधावाटप यांनी आपल्या जिल्ह्यात क्षेत्रात तातडीने शिवभोजन केंद्र सुरू होण्यासाठी नव्याने शिव भोजनालय सुरू करावीत असे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही. त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर,स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही. याची दक्षता घेण्यात येणार आहे.

शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे. तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे, जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे, भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे. त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आलेल्या आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन मिळणार असल्याने राज्यातील गरजु, गोरगरीब, शेतकरी,कामगार व मजूर वर्गाला शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Similar News