मध्य प्रदेश, त्यानंतर राजस्थान आणि आता महाराष्ट्राचा नंबर अशी चर्चा सुरू असताना महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही, पण हे सरकार स्वत: कोसळेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला आहे. पण याला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उत्तर देत एक खळबळजनक दावा केला आहे. भाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
"देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एकदा आपण ५ वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार असे म्हणून दाखवावे, त्यांचे ४० आमदार मी फोडून दाखवतो", असे आव्हान त्यांनी दिले आहे. ज्या दिवशी फडणवीस ५ वर्ष विरोधी पक्षनेते पदी राहण्याची घोषणा करतील त्या दिवशी आम्ही भाजपमधून फुटलेल्या ४० आमदारांची यादी जाहीर करु असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.