सरकारी भरती परीक्षांमध्ये गोंधळ घालण्याची सरकारला सवय - गोपीचंद पडळकर

Update: 2021-10-16 11:55 GMT

सांगली: काही दिवसांपुर्वीच आरोग्य विभागानं कोणतीही पुर्वसुचना न देता आपली परिक्षा रद्द केली होती. कोरोनाच्या संकटात, विद्यार्थी कसे तरी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते त्यांना माघारी पाठवलं होतं. आता पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला आहे. पुन्हा नव्याने होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ झाला आहे. एकाच दिवशी या दोन्ही परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठेवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकारावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, "सरकारी भरतींच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षाही यांनी सहा वेळा पुढं ढकलली होती. विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत याचं गांभीर्यच या सरकारला नाही आहे. प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाच ताळमेळ राहीलेला नाही. इतकं होऊन सुध्दा पुन्हा शासनाने नव्याने होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ घातलाय. एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परिक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय. त्यांची संधी नाकारताय.."

"एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालतं. सरकारच्या या गलथान कारभारामुळे स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, पण या प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरतं आहे.", अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर केली आहे.

Tags:    

Similar News