अमित शहा कात्रजचा घाट दाखवताहेत का?

Update: 2020-10-18 13:57 GMT

धक्कादायक राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या एका वक्तव्याने सध्या देशाच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. गेली अनेक दिवस आजारपणात असलेले अमित शहा आता राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी काही वृत्तवाहिन्यांना काल मुलाखती दिल्या.

बिहारमध्ये भाजपच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच असणार आहेत असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर सर्वाधिक धक्का शिवसेनेला बसला आहे. शिवसेनेची अवस्था हसावं की रडावं अशी झाली आहे.कारण बिहारमध्ये भाजप इतकी उदारता दाखवतेय की जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांच्याकडेच राहील. पण मग याच मुख्यमंत्रीपदाच्या हट्ट्टावरुन त्यांनी महाराष्ट्रासारखं राज्य का गमावलं. तिथे अगदी मुख्यमंत्रीपद वाटून द्यायलाही भाजप तयार नव्हती. बिहारपेक्षा महाराष्ट्र हे कितीतरी महत्वाचं राज्य आहे. आर्थिक रसद इथून मोठी मिळते. त्यामुळेच भाजपच्या वागण्यातला हा फरक नेमका कशामुळे असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

बिहारमध्ये नेमकं कोण कुणाशी लढतंय हे कळत नाहीय. वरुन युती एका पक्षाशी आणि जास्त जागा पटकावण्यासाठी आतून दुसऱ्याच पक्षाशी संधान अशी काहीशी स्थिती आहे. म्हणजे भाजप आणि नितीशकुमार एकत्र लढतायत. पण आत्तापर्यंत त्यांच्यासोबत असलेले चिराग पासवान हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतायत. चिराग यांचे बहुतांश उमेदवार हे जेडीयूविरोधातच आहेत. सगळी रस्सीखेंच मुख्यमंत्रीपदासाठी दिसतेय त्याचवेळी शाहांचं हे वक्तव्य करून धडाका उडवून दिला आहे.

महाराष्ट्रात भाजपच्या जागा शिवसेनेच्या जवळपास दुप्पट आल्या ही गोष्ट खरी आहे. बिहारमध्ये हा फरक तितका नसेलही कदाचित. पण प्रश्न केवळ मुख्यमंत्रीपदाचा नव्हता तर शिवसेनेचा इगो शांत करण्याचा होता. भाजप हायकमांडनं महाराष्ट्राच्या बाबतीत तोही प्रयत्न फारसा केला नाही. खऱंतर शिवसेना हा एनडीएतला सर्वात जुना पक्ष. नितीशकुमार तर 2014 लाही मोदींच्या थेट विरोधात होते. त्यामुळे भाजपच्या या मैत्रीमागची समीकरणं काय असा प्रश्न उपस्थित होतो. त्यातही आत्तापर्यंत बिहारमध्ये भाजपचा एकदाही मुख्यमंत्री बनलेला नाहीय. त्यामुळे यावेळी ती संधी आली तरी सोडू नये अशी अनेक नेते, कार्यकर्त्यांची इच्छा दिसतेय. पण बाकीच्या राज्यांत शत प्रतिशत भाजपचा नारा देणारे शाह बिहारमध्ये मात्र इतकी मवाळ भूमिका का घेतायत राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.

बिहारमधील राजकारणाचा आजच्या कडेला काहीच भरवसा देता येत नाह. म्हणजे नितीशकुमार आरजेडी एकत्र येऊ शकतात. चिराग पासवान आणि भाजपचं सरकार बनवू शकतात. आरजेडी आणि काँग्रेसच्या सरकारला कुणी बाहेरुन पाठिंबाही देऊ शकतं. पण नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री बनतील का याबद्दल अनेकांना साशंकता वाटतेय. त्याचेवळी अमित शाहा यांनी हे ठासून सांगणं याचं अनेकांना आश्चर्य वाटतं.

याच मुलाखतीत अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या त्या वादग्रस्त पत्रावरही आपली नापसंती दर्शवली. या पत्राची भाषा योग्य नव्हती असं त्यांनी थेट म्हटलं आहे. हाथरस प्रकरणात यूपी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना शाहांनी मात्र एकप्रकारे योगींची पाठराखण केली. हा सगळा स्थानिक पातळीवरचा दोष असल्याचं सांगितलं.

अमित शाह हे आक्रमक शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. जिथे भाजप सर्वाधिक जागा असलेला पक्ष नाहीय, तिथेही त्यांनी भाजपचा मुख्यमंत्री याआधी बसवलेला आहे. तेच अमित शाह आज बिहारमध्ये आमच्या जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्री नितीशच असं म्हणतात हे राजकीय धुरीनांच्या पचणी पडत नाही. ताठ कणा स्वीकारून महाराष्ट्रात सारखे महत्त्वाचे राज्य आणि शिवसेनेत सारखा जुना मित्र गमावल्याचे दुःख कदाचित अमित शहा यांना सतावत असेल. किंवा नितीशकुमारांना राष्ट्रीय राजकारणात येऊ न देण्यासाठी राज्यातच मर्यादित करण्यासाठीची चाल हे लवकरच कळेल. किंवा नितीश कुमार यांना गाफील ठेवून आरजेडी सोबत संधान साधून नितिश कुमारांना कात्रजचा घाट दाखवायचा, कधी प्रयत्न तर करत नसतील का? एकंदरीतच कोरोनाचे संकट असताना होऊ घातलेली बिहारची लोकसभा निवडणूक आगामी काळात देशाचे राजकारण ठरवणार आहे. त्यामुळे खऱ्या लढाईचा निकाल आणि राजकारणाची दिशा येत्या १० नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या निकालानंतरच त्यातून स्पष्ट होईल.

Tags:    

Similar News