राजीव गांधी यांनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा: अजित पवार

Update: 2020-05-21 04:20 GMT

आजचा ‘डिजिटल इंडिया’ राजीव गांधी यांनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाली आहे. असेही अजित पवार म्हणाले.

राजीव गांधींसारखा युवा पंतप्रधान देशाला लाभल्याने युवकांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले गेले. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय राजीवजींना आहे. असेही अजित पवार यांनी सांगितले. आज कोरोनाच्या संकटात अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संवाद साधत आहेत. हे देखील राजीवजींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झालं आहे. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देऊन त्यांनी युवकांना निर्णयप्रक्रियेत संधी दिली. सर्वधर्मसमभाव वाढावा, देशात व उपखंडात शांतता नांदावी म्हणून काम केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राजीव गांधी यांचा स्मृतीदिन 'दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस' म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Similar News