गेल्या काही वर्षात पाहिलं तर ऐतिहासिक सिनेमा हा प्रदर्शनाच्या आधी वादामुळे जास्त चर्चेत येतोय. त्यात आता आणखी एकाची भर पडलीय. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित सिनेमा सुद्धा प्रदर्शनाआधीच मणिकर्णिका वादात अडकलाय. सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १८२८ मधला असल्याचं दाखवण्यात आलंय. तर वास्तवात राणी लक्ष्मीबाई यांचं जन्मसाल हे १८३५ आहे असं त्यांचे वंशज अँड. विवेक तांबे यांचा दावा आहे. 'एस्सेल व्हिजन' या सिनेमाची निर्मिती करत आहे.
शिवाय शासकिय दफ्तरातही राणी लक्ष्मीबाई यांचं जन्म साल हे १८३५ असल्याचं तांबे यांनी म्हटलंय. राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मस्थळ असलेल्या वाराणसी आणि पुण्यात त्यांच्या पुतळ्यावरही १८३५ अशी नोंद आढळते. त्यामुळे लेखकांनी कोणत्या पुस्तकातून इतिहास वाचून सिनेमाची कथा लिहीली आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
आम्ही एस्सेल व्हिजनला जन्मवर्ष बदल्याची विनंती केली आहे. परंतू अद्याप त्यांनी यावर काहीच उत्तर दिलं नाही. ज्या पुस्तकाचा आधार घेऊन त्यांनी ही कथा लिहीली त्यात पुस्तकात किंवा लेखकाच्या लिखाणात काही गडबड असण्याची शक्यता आहे. पुण्यात आणि वाराणसीत ज्याठिकाणी राणी लक्ष्मीबाई यांचे पुतळे आहेत त्याठिकाणी शासनाच्या नोंदीप्रमाणे १८३५ हेच जन्मवर्ष आहे. - अँड. विवेक तांबे, राणी लक्ष्मीबाई यांचे वंशज
पुढच्या आठवड्यात एस्सेल व्हिजनला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे आणि त्यावर काही कारवाई झाली नाही तर एस्सेल व्हिजनला कोर्टात खेचणार असल्याचं अँड. विवेक तांबे यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'शी बोलतांना सांगितलं. यासंदर्भात 'एस्सेल व्हिजन'शी संपर्क साधला असता त्यांनी कोणातीही प्रतिक्रीया द्यायला स्पष्ट नकार दिला.