आज काढलेला मोर्चा शांततेत असला तरी जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढचा मोर्चा मात्र शांततेत नसेल असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील चेंगराचेंगरी प्रकरणाच्या निषेधार्थ आज राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. लोक सांगतात की मोदींचा आवाज ऐकायला आला की टीव्ही बंद करावासा वाटतो, इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान पाहिला नाही, आधी वेगळं बोलतो, आता वेगळं बोलतो असं राज म्हणाले. मूठभर गुजरातींसाठी बुलेट ट्रेन सुरु करणार, आपल्या माणसांचं तिकडे काम काय? असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोगाने सरकारच्या नादाला लागून निर्णय घेऊ नये, सरकार बदलत असतात असं राज एकत्र निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर म्हणाले. राज ठाकरेंचे भाषण सुरू असताना राज्यात अनेक ठिकाणी वीज गेली. हा धागा पकडून राज ठाकरे म्हणाले की, वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य उगवणारच.
https://youtu.be/xN_Q1QNpcaY