सध्या मैं भी चौकीदार मोहीमेमुळे भारतीय जनता पक्षाच्या बहुतेक सर्वच नेत्यांनी आपल्या नावासमोर चौकीदार असं लिहिलं आहे. मात्र खऱ्या चौकीदारांच्या व्यथा मात्र समोर येताना दिसत नाहीयत. मॅक्समहाराष्ट्र ने काही सुरक्षा रक्षकांशी केलेल्या चर्चेनंतर भयानक वास्तव समोर आलं आहे.
सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहिती नुसार
सुरक्षा रक्षकांना नियमित वेतनभत्ता मिळत नाही.
दिवाळीचा बोनस मिळत नाही.
ठेकेदारच पैशांची लूट करतात.
सुरक्षा साधनही पुरवली जात नाहीत.
गणवेशाचे पैसे आधीच ठेकेदार वळती करतात.
हल्ला झाला अथवा अपघात झाला की ठेकेदार हात वर करतात व शासनही.
एखाद्या हल्ल्यात अपंगत्व आलं किंवा जीव गेला तर कोणीच जबाबदारी घेत नाही.
आपल्या या समस्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांनी वारंवार सरकार समोर मांडल्या आहेत. असंघटीत क्षेत्रात जे सुरक्षा रक्षक काम करतात त्यांची अवस्था तर अतिशय बिकट आहे. खास करून गृहनिर्माण सोसायट्यांच्या सुरक्षा रक्षकांना तर अमानवीय वागणूक दिली जाते. त्यांना लोक घरच्या कामांपासून बाजारातून सामान आणण्यापर्यंत सर्व कामं सांगतात. त्यांना मिळणारं वेतन आणि कामाचे तास यांचं ही गणित कुठेच बसत नाही.
साठी-सत्तरीचे सुरक्षा रक्षक ही सोसायट्यांमध्ये नेमले जातात. अनेक ठिकाणी स्वच्छतागृह, आराम करण्यासाठी व्यवस्था ही नसते, अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षक काम करताना दिसत असतात. या निवडणूकीच्या निमित्ताने चौकीदार शब्द चर्चेत आला, मात्र या चौकीदारांच्या समस्या तशाच आहेत असं मत सुरक्षा रक्षकांनी व्यक्त केलं आहे.