आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तनाची यात्रा करुन जनतेशी संपर्क साधू लागली आहे. दरम्यान बुधवारी नेहरु मैदान येथे झालेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला असून हे सरकार थापा मारणारं आणि जनतेला फसवणारं आहे. तसेच विकासाची स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या काळात सर्व विकासकामे रखडली आहेत. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी फकीर असल्यामुळे त्यांना महागाईची जाणीव नाही कारण त्यांना घरी कुणी नाही अशा शब्दांत मोदी सरकारवर घणाघात केला.
अण्णा हजारे यांच्या उपोषणबद्दल पवार म्हणाले की, आघाडीच्या काळातदेखील अण्णा हजारे उपोषण करायचे. मात्र आम्ही त्यांची लवकर दखल घेत असायचो. मात्र भाजपच्या काळात अण्णांची प्रकृती बिघडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले. यावररून त्यांना अण्णा यांची किती चिंता आहे हे लक्षात येते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. ते नक्कीच सोबत येणार, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.