राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी, कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? काय आहे शरद पवारांची चाल?
येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेच्या ५२ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून 7 जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे या सात जणांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या 7 जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूका होत आहे. सहा वर्षांपूर्वी जेव्हा 7 जागांसाठी ही निवड झाली होती. तेव्हा ही निवडणूक बिनविरोध झाली होती. आता याही वेळी ही निवडणूक बिनविरोध होणार की, एखादा जास्तीचा उमेदवार रिंगणात येऊन घोडेबाजाराला ऊत येणार हे देखील पाहावं लागेल.
महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार राज्यसभेवर निवडून जातात. दर दोन वर्षांनी 7, 6 आणि 6 अशा जागा रिक्त होतात. राज्यसभेच्या उमेदवाराची निवडणूक क्रमदेय पद्धतीने होते. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची मतं मिळवण्याची गरज आहे.
निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवारा किती मत मिळायला हवीत...?
महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. आणि या आमदारांना एकूण सात खासदारांना निवडून द्यायचे आहे. क्रमदेय पद्धतीमध्ये निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची मत मिळायला हवी. त्यामध्ये मतांचा कोटा तयार केला जातो. क्रमदेय पद्धतीच्या सुत्राप्रमाणे 288/एकूण उमेदारांची संख्या +1 म्हणजे
288/8 = 36 म्हणजे उमेदवारास निवडून येण्यासाठी 36 मतांची आवश्यकता आहे.