दुष्काळाच्या दृष्टचक्राशी संघर्ष करतांना पीक पद्धतीत बदल करूनही शेतकऱ्यांच्या नशिबी नैराश्यचं येत असल्याचं चित्र आहे. लातूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी कांद्याचं भरघोस उत्पादन घेतलं. मात्र, बाजारात कांद्याचे भावच पडल्यानं शेतकरी त्रस्त झाला. त्यामुळं अशा परिस्थितीत शासनानं तातडीनं मदतीचा हात द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करू लागलाय.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील याकतपुर शिवारात शिवराम बेळंबे यांनी ६० गुंठ्यात कांदा लागवड केली. जवळपास ८० क्विंटल कांदा झाला. त्यासाठी रोपाचा खर्च ३ हजार ५०० रू, लागवड खर्च ८ हजार, खते औषधे फवारणी खर्च ६ हजार, खुरपणीसाठीचा खर्च ५ हजार, काढणीसाठीचा खर्च १० हजार आणि वाहतुक खर्च ३ हजार रुपये झाला. त्या मध्ये ४० क्विंटल कांदा हा लातुरच्या बाजारात नेण्यात आला त्याला ३ रुपये भाव मिळाला. त्यासाठी त्यांना १२ हजार रूपये मिळाले. म्हणजेच साधारणपणे कांद्याचा सरासरी भाव ३ रूपये गृहीत धरला तर ८० क्विंटल कांद्यातून बेळंबे यांना २४ हजारांचं उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणजेच कांद्याच्या उत्पादनासाठी सुमारे ३६ हजार रूपये खर्च करून बेळंबे यांना १२ हजारांचं नुकसान झालेलं आहे.
यंदा जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यात रब्बी पेरा ही अतिदुर्गम झाला ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची थोडीबहुत सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळ भाज्या घेण्याकडे पाऊल उचलले. त्यातुन कांदा उत्पादनाचा मार्ग अनेक शेतकऱ्यांनी निवडला. कांद्याचे उत्पादनही भरघोस झाले. पण या कांद्याला बाजार दोन रुपयांपासून आठ रुपयापर्यंत बाजार भाव मिळत आहे. त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च हा सुद्धा पदरातुन करण्याची वेळ आली आहे. गतवर्षी तूर व हरभऱ्याला आणि भाव न मिळाल्यानं शेतकरी तोट्यात गेला ज्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही त्यांचा शेतमाल खरेदी केला नाही त्यांना अनुदान रूपाने सरकारने मदत केली. त्याच धर्तीवर आता कांदा उत्पादकांनाही मदत करण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे.