अतिउत्साहात तत्वांचा बळी नको, सहकार संदर्भात शरद पवार यांचं मोदींना पत्र

Update: 2021-07-17 15:05 GMT

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली. जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेक लोक हे भेट कशासाठी झाली? या संदर्भात तर्क लावत असताना शरद पवार यांनी एक ट्वीट करत या भेटीचं कारण दिलं आहे.

केंद्र सरकारने एक नवीन केंद्रीय सहकार खातं तयार केलं आहे. आणि या खात्याचे मंत्री अमित शहा आहेत. याचं सहकाराबाबत शरद पवार यांनी काही मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडले आहेत. या संदर्भात शरद पवार यांनी एक विस्तृत पत्र मोदी यांना दिलं आहे. या पत्रात तरतुदी 97 वी घटनादुरुस्ती, राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि सहकाराची तत्वे या संदर्भात नव्यानं करण्यात आलेले बदल विसंगत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

पवार यांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

सहकारी बॅंकिंग क्षेत्र राज्याचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत पवार यांनी यामध्ये केंद्र हस्तक्षेप करु शकत नाही असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेने सहकारासंदर्भात कायदे केले आहेत. आणि राज्य केंद्राने बनवलेल्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही.

आरबीआयचा सहकार क्षेत्रात वाढता हस्तक्षेप: रिझर्व्ह बँकेच्या नव्या तरतुदींच्या काही कलमांमुळे सहकारी बँकांच्या कामात हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे या तरतुदी असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहेत. त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच आणल्या गेल्या आहेत.

या मुद्यावर पवार यांनी भाष्य केलं आहे.

दरम्यान येत्या १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. त्यामुळे अधिवेशनासंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचीही शक्यता आहे. कोरोना संकटाची हाताळणी, शेतकरी आंदोलन, अर्थव्यवस्था, भारत-चीन सीमावाद या मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे. तसेच काही महत्त्वाची विधेयकं देखील सरकारतर्फे मांडली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भेटीत पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली असण्याची शक्यताही व्यक्त होते आहे.

Tags:    

Similar News