काँग्रेसमध्ये सत्तेचे विक्रेंद्रीकरण करण्याची गरज, 23 ज्येष्ठ नेत्यांची मागणी

काँग्रेस पक्षात अमुलाग्र बदल करण्याची मागणी 23 ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केली आहे. पाहूया या पत्रात नेमक्या काय मागण्या करण्यात आल्या आहेत.

Update: 2020-08-23 03:15 GMT

काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत असलेली अनिश्चितता आणि पक्षांतर्गत मतभेदांमुळे पक्ष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असून काँग्रेस पक्ष कमजोर झाला आहे, त्यामुळे पक्षात अमूलाग्र बदल करण्याची मागणी काँग्रेसज्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केली आहे. 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.

6 वर्ष उलटून गेली असली तरी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत. त्यामुळे पक्षाला मरगळ आलेली आहे. यासाठी काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात अमुलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. यामध्ये 5 माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, विद्यमान खासदार आणि काही माजी केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसने याससंदर्भातले वृत्त दिले आहे.

2 दिवसांपूर्वी पाठवण्यात आलेल्य या पत्रात भाजपची चांगली प्रगती झाल्याचे मान्य करत देशातील तरुण नरेंद्र मोदींकडे आकर्षित झाले आहेत हेसुद्धा मान्य करण्यात आले आहे. काँग्रेसचा मूळ आधार असलेल्या वर्गाने फिवलेली पाठ आणि तरुणांचा अविश्वास यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहिलेला नाही. या पत्रात त्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष जो पूर्णपणे सक्रीय असेल आणि लोकांना दिसत राहिल अशी मागणी केली आहे. पक्षाचा पुनरुद्धार करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक, संस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीने विकसित करण्याची गरज या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रावर राज्यसभेतील विरोक्षी पक्षनेते गुलाम नबी आझाद, शशी थरुर, कपिल सिब्बल, मनिष तिवारी यांच्यासह 23 नेत्यांच्या सह्या आहेत. जेव्हा देशासमोर स्वातंत्र्यानंतरचे सगळ्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक संकट उभे असताना पक्षाचा ऱ्हास होतोय, अशी खंत या पत्रात या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

या पत्रात पक्षात अमूलाग्र बदलांची मागणी करत सत्तेचे विक्रेंदीकरण, राज्याच्या पातळीवर संघटना मजबूत करणे, स्थानिक पातळीपासून ते काँग्रेस कार्यकारिणीपर्यंत पक्षात सर्व पातळ्यांवर निवडणुका घेऊन यंत्रणा विकसित केली पाहिजे आणि मध्यवर्ती संसदीय मंडळ तयार करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Similar News