मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती समस्यांच्या विळख्यात

Update: 2019-08-27 06:14 GMT

आशिया खंडातील घाऊक भाज्यांची सर्वात मोठी बाजारपेठ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही नवी मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये या बाजार समितीसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे तिला नवी मुंबईत बांधण्यात आलं. मात्र, आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असूनही ही बाजारपेठ अनेक समस्यांच्या विळख्यात आहे हे आपल्याला बाजार फिरताना जाणवतं.

जिथे बघावं तिथे भाज्यांचा कचरा आणि चिखल. जागोजागी फरशा निघालेल्या आहेत. लोखंडी जिने खचलेल्या अवस्थेत आहेत. एकंदरीत या बाजारात समस्यांचाच बाजार मांडला गेलाय. त्यामुळे याठिकाणी असलेले व्यापारी आणि हमाल या समस्यांमुळे त्रस्त आहेत. व्यापारी म्हणतात की, आम्ही सगळे प्रकारचे कर भरतो तरी देखील कृषी उत्पन्न बाजार समिती या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आम्ही तक्रार कोणाकडे करायची?

भाजी मार्केटमधील व्यापारी संघाचे अध्यक्ष कैलास ताजने 'मॅक्स महाराष्ट्र'शी बोलताना म्हणाले की, "आम्ही वारंवार बाजार समितीला या सगळ्या समस्यांबाबत पत्रव्यवहार करतो, बैठका घेत असतो तरी देखील काही समिती कोणतीच अंमलबजावणी करत नाही. आता आम्ही थकलो आहोत. समितीने गेल्या महिन्यात एक बैठक बोलावली होती. त्यात समस्यांचे सगळे मुद्दे मांडण्यात आले. तरी अजून देखील काही अंमलबजावणी झालेली नाही. आता जर २० तारखेपर्यंत त्यांनी काही केलं नाही तर २१ ऑगस्टपासून आम्ही असहकार आंदोलन करणार आहोत आणि इथून पुढे बाजार समित्यांचा कोणताही कर आम्ही भरणार नाही ही आमची ठाम भूमिका असणार आहे."

बाजार समिती परिसर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने इथे सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. उद्या इथे काही घातपात झालाच तर त्याला कोण जबाबदार असेल? या संपूर्ण समस्यांबाबत 'मॅक्स महाराष्ट्र'च्या टीमने बाजार समितीची काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Full View

Similar News