कुणाला पुसायचाय जालियनवाला बाग हत्याकांडाचा इतिहास?
जालियनवाला बाग या राष्ट्रीय स्मारकांचं पर्यटन स्थळ करून राज्यकर्ते काय करु इच्छितात? यामागे इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न आहे का? वाचा ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांचा लेख...
१३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखीचा सण होता. रौलट कायद्याच्या विरोधात अमृतसरमध्ये असंतोष धगधगत होता. ११ एप्रिलपासून अमृतसरची नाकेबंदी करण्यात आली होती. रौलट कायद्याला विरोध केला म्हणून सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना अटक करण्यात आली. या अटकेचा निषेध करण्यासाठी जालियनवाला बागेत लोक जमले. संचारबंदी वा पोलीस राज्याची पर्वा न करता जुलमी ब्रिटीश सरकारचा संघटीत परंतू निःशस्त्र प्रतिकार करायला लोक जालियनवाला बागेत आले.
हिंदू, मुसलमान, शीख तिन्ही धर्मांचे लोक ब्रिटीश शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यामध्ये महिलांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती. मुलं तर नव्हतीच. कारण आपण सभा बंदीचा हुकूम मोडतो आहोत म्हणजे शिर तळहातावर घेऊन रणांगणात उतरतो आहोत. याची पूर्ण कल्पना निदर्शकांना होती. जमलेले निदर्शक अतिशय सामान्य कुटुंबातले होते. बहुतांशी शेतकरी कुटुंबातले. जालियनवाला बाग ही मोकळी जागा होती. तिथे ना हिरवळ होती ना झाडं-फुलं.
सभा ताबडतोब बरखास्त करा आणि मैदान खाली करा असा आदेश पोलिसांनी दिला. पण शांततामय निदर्शनं सुरूच राहिली. बागेचे दरवाजे बंद करण्यात आले आणि शांतपणे निदर्शन करणाऱ्या जमावावर चहू बाजूंनी गोळीबार करण्यात आला.
एक हजार लोक ठार झाले तर दीड हजारापेक्षा अधिक जखमी. उधम सिंगाचे आई-वडील या हत्याकांडात ठार झाले. या हत्याकांडाचा बदला घेण्याची शपथ पोरवयातल्या उधमसिंगाने मनोमन घेतली. मोठा झाल्यावर तो इंग्लडला गेला. १९१९ साली पंजाबचा नायब राज्यपाल होता मायकेल ओडवायर. १९४० साली उधमसिंगाने त्याला गोळ्या घातल्या. या प्रसंगी उधमसिंगाने धारण केलेलं नाव होतं- राम मोहंमद सिंग आझाद.
जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक (नॅशनल टोम्ब) आहे असं गांधीजी म्हणाले होते. या हत्याकांडाच्या निषेधात रविंद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी ब्रिटीश सरकारला परत केली. जालियनवाला बाग खाजगी मालकीची होती. काँग्रेस पक्षाने ती विकत घेतली आणि तिथे स्मारक उभारलं.
हिरवळ, झाडं, स्मृतिस्तंभ, बागेतील विहीरीचं सौंदर्यीकरण इत्यादी करण्यात आलं. बंदुकीच्या गोळ्या भिंतीत शिरल्या होत्या तिथे वर्तुळं काढण्यात आली. या स्मारकाने वस्तुतः हत्याकांडाची भीषणता सौम्य केली. सत्तरच्या दशकापर्यंत लोक तिथे यायचे यात्रेसाठी. जालियनवाला बाग हे पर्यटनस्थळ नव्हतं. सुवर्णमंदिरात माथा टेकल्यावर, जालियनवाला बागेत माथा टेकण्यासाठी लोक येत. जनमानसात जालियनवाला बागेचं स्थान तीर्थस्थळाप्रमाणे होतं. हुतात्म्यांना वंदन करायला लोक तिकडे जमत.
मागच्या महिन्यातच जालियनवाला बागेचं नूतनीकरण करण्यात आलं. ज्या वाटेने जनरल डायर जालियनवाला बागेत आला. त्या अरुंद रस्त्यावरील भिंतींवर जालियनवाला बागेत आलेल्या लोकांची भित्तीचित्रं उभारली आहेत. त्यामध्ये स्त्री-पुरुष, लहान मुलं आनंदाने बैसाखी साजरी करायला चालली आहेत असं चित्रण आहे.
जालियनवाला बागेत लाईट-अँण्ड साऊंड शो सुरु करण्यात आलाय. जालियनवाला बाग हे आता यात्रास्थळ वा तीर्थस्थळ वा श्रद्धेय स्थळ नाही तर पर्यटनस्थळ बनवण्यात आलंय. जगभरातील टुरिस्टांनी तिथे येऊन संध्याकाळ एन्जॉय करावी. जालियनवाला बागेचा ऐतिहासिक ठेवा पूर्णपणे नष्ट करण्यात येतोय. शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाचं विकृतीकरण आपण करतो आहोत. याचं भान सत्ताधारी वा मतदार कुणालाही नाही. सरासरी भारतीय माणसाच्या सांस्कृतिक बुटकेपणाचं हे लक्षण आहे.
ऑश्विटझ् या छळछावणीचं असं नूतनीकरण करायचं युरोपातील कुणालाही सुचलं नाही. तिथेही लाईट अँण्ड साऊंड शो करता आला असता की. परंतु नाझी अत्याचारांची स्मृती कायम ठेवावी जेणेकरून भविष्यात कधीही नाझी विचाराने जगात डोकं वर काढू नये यासाठी या छळछावणीचं वास्तविक रुप जसंच्या तसं ठेवण्यासाठी पैसे खर्च केले जातात.
भारतीय मानस वेगळं आहे. इतिहास, अन्याय, शोषण, अत्याचार यांच्या स्मृतींचा उत्सव करण्याची परंपरा भारतात आहे. त्यामुळे जालियनवाला बाग असो की अन्य कोणत्याही स्मृती त्यांचं जतन करण्याची आधुनिक विद्या भारतीय मानसाने आत्मसात केलेली नाही. कास पठार असो की मध्य रेल्वेचं मुख्यालय त्यांच्या जतनासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधी हवा असतो आपल्याला रस असतो केवळ नावं बदलण्यात.
सुनील तांबे, ज्येष्ठ पत्रकार