Raja Dhale : जातीवादी लोकांना आंबेडकरी उत्तर म्हणजे राजा ढाले होते

Update: 2019-07-16 18:36 GMT

पँथर...राजा ढाले नावाच वादळ...आंबेडकरी चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी प्राणपणाला लावलं असा अवलिया. त्यांच्या त्यागातून आंबेडकरी समाज आज निर्भीडतेचे धडे घेतोय. नामांतर चळवळीत महाराष्ट्राच्या खेड्यापाडयात जाऊन पँथर तयार करणारा हा वाघ. या पँथरला स्वतःच्या घराची चिंता नव्हती. राजा ढाले म्हणजे केवळ आणि केवळ आंबेडकरी चळवळ चालवणारा लढवय्या शूरवीर होते. राजा ढाले नावाचं वादळं गावं आणि शहरं उधवस्त करणारं नाही, तर बुद्धाची शांती आणि भीमाची क्रांती करणार होतं.

कित्येक बराकी पायाखाली टाकून, असंख्य केसेस अंगावर घेऊन निळा झेंडा फडकला पाहिजे, समाज स्वाभिमानाने जगला पाहिजे आणि बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला मिळालं पाहिजे हीच त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शक्य ते केलं. राजा ढाले यांनी सरकार ला प्रश्न तर विचारलेच पण न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच ठेवला.

जातीवादी लोकांना आंबेडकरी उत्तर म्हणजे राजा ढाले होते. या पँथरने असंख्य पँथर तयार केले. राजा ढाले आला म्हणलं तरी पळता भुई कमी पडायची. निश्चितच त्यांच्या जाण्याने आंबेडकरी समाजात फार मोठी उणीव निर्माण झालीय. ते पुस्तकरूपात आंबेडकरी, परिवर्तनवादी लोकांच्या मनात अगदी सूर्यासारखे जीवंत आहेत. त्यांचे कार्य समुद्राएवढं खोल आणि अथांग आहे.

राजा ढाले ते भाषाप्रभू होते. त्यांचे भाषण ऐकण्याचा मला अनेकदा योग आला. आकाशाएवढा प्रचंड ज्ञानकोष असलेलं त्यांचं व्यक्तीमत्व होतं. गेल्यावर्षी त्यांच्या वाढदिवसाला रामदास आठवलेंनी मोठा कार्यक्रम ठेवला होता. या वयातही त्यांची तीच ऊर्जा, तोच रुबाब, तोच दरारा कायम होता.

अशा या महान लढवय्यास विनम्र अभिवादन..

जय भीम!

Similar News