परिवहन मंत्री अनिल परब शिवसेनेचे 'कलेक्टर' ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जोरदार टीका

Update: 2021-10-29 14:25 GMT

सिंधुदुर्ग :  राज्यात एस. टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊननंतर तब्बल 28 एस. टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र , परिवहन मंत्री याकडे लक्ष देत नाहीत. एस. टी बसची अत्यंत वाईट अवस्था आहे, खरतर ही वाहनं रस्त्यावर धावण्याच्या लायकीची राहिलेली नाहीत त्यात एस. टी कर्मचारी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत आहे. त्यांना वेळेवर पगार नाहीत, कोणत्या सुविधा नाहीत. मात्र, परिवहन मंत्र्यांची प्रॉपर्टी एवढी झाली आहे की, ते स्वतःच्या उत्पन्नातून एस.टी चालवू शकतात एवढे पैसे त्यांनी गोळा केले आहेत ते शिवसेनेचे 'कलेक्टर' आहे अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अनिल परब यांच्यावर केली आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दीपक हरिभाऊ काकडे या एस टी कर्मचाऱ्याने एस टी बस मागेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. वास्तविक पाहता कालच परिवहन मंत्री अनिल परब आणि एस टी कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप मागे घेण्यात आला, त्यानंतर लगेचच एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत एसटी महामंडळ सकारात्मक असून ,आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Tags:    

Similar News