Palghar Protest : लाल वादळात भगवं वादळ मिसळं तर महाराष्ट्र सरकारपुढे मोठं आव्हान उभं राहील - संजय राऊत
X
Palghar Protest वाढवण बंदराला विरोध, जंगल, जमिनी वाचवण्याचे मुद्दे आणि चौथ्या मुंबईमुळे पालघरचा होणारा एकांगी विकास याला विरोध करण्यासाठी पालघरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आदिवासी-शेतकरी, मोठ्याप्रमाणात महिलांचा सहभाग पाहायला मिळाला. या भूमिपुत्रांच्या लढाईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आम्ही त्यांच्या सोबत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत ? Sanjay Raut
हा भूमिपुत्रांच्या हक्काचा विषय आहे त्यांच्या जमिनींचा विषय आहे. जमीन, जंगल, पाणी, समुद्र हे वाचविण्यासाठी ही लढाई सुरु आहे. पालघरमध्ये गुजराती बोर्ड लागायला लागले... का? आदिवासींना का मराठी वाचता येत नाही. आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी काय मराठीशी शत्रुत्व घेतलंय. त्यांची भाषा मराठी आहे. ही लढाई सांस्कृतिक आक्रमणाविषयी आहे. ज्या पद्धतीने तिकडे गुजरातचे ठेकेदार घुसतायेत जमिनी लुबाडतायेत आणि वाढवण बंदराच्या निमित्तानं निसर्ग आणि नैसर्गिक संपत्तीची विल्हेवाट लावली जातेय. त्याचा फटका हा शेवटी तिकडच्या भूमिपुत्रांना आदिवासींना बसणार आहे. म्हणून ही लढाई आहे. हा त्याचा पहिला टप्पा आहे. त्यांच्या लढाई आम्ही त्यांच्यासोबत आहोत. काल लाल वादळ होतं त्यात भगवं वादळ मिसळं तर महाराष्ट्र सरकारपुढे मोठं आव्हान उभं राहील. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काढण्यात आलेला ६० किलोमीटरचा ‘लाँग मार्च’ वाढवण बंदराला विरोध, जंगल, जमिनी वाचवण्याचे मुद्दे आणि चौथ्या मुंबईमुळे पालघरचा होणारा एकांगी विकास याला विरोध करण्यासाठी आहे. जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारनं योग्य भूमिका दाखविली नाही तर मुंबईच्या दिशेनं हा मार्च काढण्यात येईल. रेल्वे रोको करण्यात येईल, असा इशारा यावेळी कॉम्रेड नेते अशोक ढवळे यांनी दिला.
या लाँग मार्चमध्ये पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांतील सुमारे ५० हजार शेतकरी, आदिवासी आणि कष्टकरी सहभागी झाले आहेत.






