तुमच्या प्रभागात किती नगरसेवक असतील ?
X
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. सर्वोच्च न्यायालयानं तसे आदेशच दिले होते. त्यानुसार राज्यातील २९ महानगरपालिका आणि २५७ नगरपालिकांमध्ये प्रभाग रचना केल्यानंतर मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्याचे आदेश नगरविकास विभागानं सर्व पालिकांना दिले आहेत. या नव्या आदेशानुसार महानगरपालिकांमध्ये ८ सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार प्रभागांची संख्या गृहीत धरावी, अशी सूचना करण्यात आलीय.
सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी जी कालमर्यादा ठरवून दिलेली आहे, त्यानुसार या निवडणूका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होतील. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतांना महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभागांची संख्या वाढविण्यात आली होती. सत्ताबदल झाल्यावर महायुती सरकारनं महाविकास आघाडी सरकारचा प्रभाग वाढीचा निर्णय कायम ठेवला.
मुंबई महापालिकेची प्रभाग रचना
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार मुंबई महापालिकेतली सदस्य संख्या ही २२७ इतकी निश्चित करण्यात आलीय. २२७ सदस्य संख्या समोर ठेवूनच प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागानं दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेत एक सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेतील सदस्य संख्या ही २३६ केली होती. मात्र, महायुती सरकारने ही सदस्य संख्या पुन्हा २२७ केली आहे. यानुसारच मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक पार पडणार आहे.
इतर महानगरपालिकांमध्ये चार सदस्यांचा मिळून एक प्रभाग असणार आहे. अपवादात्मक स्थितीत प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांपर्यंतही असू शकतो. नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. अपवादात्मक स्थितीत नगरपालिकांमध्येही तीन सदस्यांचा प्रभाग असू शकतो.
प्रभाग रचना करताना महापालिका क्षेत्राची माहिती असणारा अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणकतज्ज्ञ यांची महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाला मान्यतेसाठी पाठवायचा आहे. त्यानंतरच राज्य निवडणूक आयोगाकडून या प्रभाग रचनेला मान्यता मिळेल.
राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावर प्रभागांचे प्रारूप जाहीर केले जाईल. या प्रारुप आऱाखड्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी करून प्रभागांची अंतिम रचना निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यावर प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली जाईल. ही आठ टप्प्यातील प्रक्रिया पार पडण्यासाठी किमान अडीच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची अंतिम रचना ही ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्यामुळं या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जाते.
महापालिकेतील प्रभाग संख्या
मुंबई : २२७
ठाणे: १३१
नवी मुंबई : १११
कल्याण-डोंबिवली : १२२
पनवेल : ७८
वसई विरार : ११५
मीरा-भाईंदर : ९५
नागपूर: १५१
पुणे : १६२
पिंपरी-चिंचवड : १२८
छत्रपती संभाजीनगर: ११५
कोल्हापूर : ८१