होळीची धग आणि तिसर्या महायुद्धाचे भय कायम असताना, गांधींचा हा विचार ट्रम्प यांना कोणी सांगणार आहे का?
जगाची होळी करणार्या मस्तवालांना गांधींच्या दिवाळीची प्रकाशवाट दिसणार आहे का? सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संजय आवटे यांचा लेख
X
Gandhi views on war होळी आणि दिवाळी! चार ऑक्टोबर १९३८ रोजी, ऐन दिवाळीत, दक्षिण आफ्रिकेत असलेल्या आपल्या सूनबाई सुशीला यांना लिहिलेल्या पत्रात महात्मा गांधी यांनी म्हटले होतेः “सूनबाई, सर्व बाजूंनी होळी धगधगत आहे, तेव्हा आपण दिवाळी कशी साजरी करणार? जिकडे तिकडे पाहिले, तर द्वेष आणि कटुता दिसते. त्यामुळे कोणी दिवाळी साजरी करू इच्छित असेल, तर त्याने द्वेष आणि कटुता कमी करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला शुद्ध करून प्रेमाच्या गावाला जावे. दिवाळीची प्रकाशवाट शोधत राहावे.” दुसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग असताना गांधींनी हे लिहिले होते.
“Trump’s approach to Iran is reckless” असे म्हटले आहे, ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या अग्रलेखात. अपवाद वगळता सर्व अमेरिकी माध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवला आहे. अवघ्या जगाला युद्धाच्या खाईत ढकलणारे असले अध्यक्ष आम्हाला नको आहेत, हीच भूमिका तिथे व्यक्त होत आहे. ट्रम्प यांचा इराणबद्दलचा दृष्टिकोन निराधार आणि धोकादायक आहे. कारण त्यांनी युद्ध सुरू केले, पण तशी स्पष्ट कारणे, उद्दिष्ट्ये सांगितली नाहीत. अशा बेमुर्वतखोर पद्धतीने युद्ध लादणे कोणत्याही समंजस व्यक्तीला मान्य होणारे नाही.
धाकट्या जॉर्ज बुश यांनी इराकवर हल्ला चढवला, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी थेट विरोध केला होता. सद्दाम हुसेन यांच्याकडे विध्वंसक अण्वस्त्रे आहेत, असा बागुलबुवा अमेरिकेने उभा केला. प्रत्यक्षात मात्र तो दावा निखालस खोटा असल्याचे लक्षात आले. तोवर अमेरिकेने शांततेच्या नावाखाली सद्दाम हुसेन यांना संपवले होते. तेल, वायू आणि नैसर्गिक संसाधने यावरील मालकीसाठी आणि मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी अमेरिकेने जगभर लष्करी तळ तयार केले. बुश यांच्यानंतर आलेल्या बराक ओबामांनी अमेरिकेला थोडे शहाणे केले. मात्र, तीच अमेरिका आज भयंकर वळणावर उभी आहे.
व्हेनेझुएलानंतर इराणच्या विरोधात ट्रम्प आणि नेत्यानाहू यांनी शड्डू ठोकले. जगाचे रुपांतर त्यांनी युद्धभूमीत करून टाकले. अमेरिकी काँग्रेसची मंजुरी न घेताच ट्रम्प यांनी हल्ले सुरु केले. तिथल्या संविधानानुसार युद्ध घोषित करण्याची जबाबदारी काँग्रेसची. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात इराक आणि अफगाणिस्तानमधील दीर्घकाळ चाललेल्या युद्धांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. प्रमुख उद्दिष्ट स्पष्ट नसल्यामुळे ते युद्ध भयंकर लांबले. त्यातून काय साध्य झाले? इराणमध्येही अशीच स्थिती निर्माण होणार का, अशी चिंता जगाला वाटू लागली आहे. ‘अमेरिका फर्स्ट’च्या घोषणेने सत्तेवर आलेल्या या मस्तवाल नेतृत्वाने सत्तासंतुलनाचा पुरेसा विचार न करता घेतलेली अशी आक्रमक भूमिका अमेरिकेलाही दीर्घ काळासाठी महागात पडू शकते.
इराण हा केवळ पश्चिम आशियातील एक देश नाही. तो तेलबाजार, प्रादेशिक सुरक्षा, भूराजकीय स्थान, इस्रायल-अरब संबंध आणि रशिया-चीन यांच्याशी निगडित जागतिक समीकरणांचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे हे सूडयुद्ध भडकणार, हे स्पष्ट झाले आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगातील आघाडीचा उत्पादक कतारने द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) उत्पादन तात्पुरते थांबविल्याने भारत आणि युरोपमध्ये इंधन तुटवड्याची भीती वाढली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून युरोपमधील गॅस दर ३० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. आता रशिया आणि चीनने थेटपणे इराणला पाठिंबा दिल्याने युद्धाचा भडका आगामी काळात आणखी वाढणार आहे. युद्ध आणखी आठवडाभर चालेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अनेक देशांना युद्धाची झळ बसू लागली आहे.
ट्रम्प आणि कंपनीच्या या मस्तवालपणाची किंमत केवळ एका देशाला नव्हे, तर संपूर्ण मानवी समुदायाला मोजावी लागणार आहे. या युद्धाचा सर्वात धोकादायक पैलू म्हणजे त्याचा संभाव्य भडका. तेलवाहतुकीचा कणा मानला जाणारा होर्मुझचा सामुद्रधुनी मार्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था हादरणार आहे. तेलाच्या किमती आधीच अस्थिर आहेत. विमाने वळवली जात आहेत. दूतावासांमधील कर्मचारी हलवले जात आहेत. जागतिक बाजारपेठांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारतासारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांसाठी ही स्थिती फारच चिंताजनक आहे.
युद्धभूमीवर माणसं मरतात. घरं उद्ध्वस्त होतात. चिमुकल्यांच्या डोळ्यातलं स्वप्न संपतं. हे युद्ध केवळ रणांगणापुरतं मर्यादित राहत नाही. ते प्रत्येकाच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतं. अशा या वातावरणात वर म्हटलेल्या पत्राची आठवण येते. चार ऑक्टोबर १९३८ रोजी, ऐन दिवाळीत, दक्षिण आफ्रिकेत असलेल्या आपल्या सूनबाई सुशीला यांना लिहिलेल्या पत्रात महात्मा गांधी यांनी म्हटले होतेः “सूनबाई, सर्व बाजूंनी होळी धगधगत आहे, तेव्हा आपण दिवाळी कशी साजरी करणार? जिकडे तिकडे पाहिले, तर द्वेष आणि कटुता दिसते. त्यामुळे कोणी दिवाळी साजरी करू इच्छित असेल, तर त्याने द्वेष आणि कटुता कमी करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला शुद्ध करून प्रेमाच्या गावाला जावे. दिवाळीची प्रकाशवाट शोधत राहावे.”
दुसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग असताना गांधींनी हे लिहिले होते. होळीची धग आणि तिसर्या महायुद्धाचे भय आज कायम असताना, गांधींचा हा विचार ट्रम्प यांना कोणी सांगणार आहे का? युद्ध नव्हे, बुद्ध हवेत; जगाला भगवान महावीर आणि येशू हवेत, हे कोणी सांगणार आहे का?
जगाची होळी करणार्या मस्तवालांना गांधींच्या दिवाळीची प्रकाशवाट दिसणार आहे का?
(साभार - सदर पोस्ट संजय आवटे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)
Gandhi’s message, peace, global war tensions, Sanjay Awate, Gandhi views on war, Gandhi Diwali letter, Holi and Diwali meaning, Festival symbolism India, India oil crisis news, Qatar LNG production halt, Strait of Hormuz crisis, Fuel price increase India, Trump foreign policy criticism, US Israel Iran tensions, Global peace message Gandhi, War impact on economy, Festival season and global unrest






