Asha Bhosle tribute : ...जो भी हैं बस यही एक पल हैं !
स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सुप्रसिद्ध गाण्यांचा अर्थ आणि त्यांच्या आवाजातील जादू यासंदर्भात लेखक श्रीनिवास बेलसरे यांचा लेख
X
...जो भी हैं बस यही एक पल हैं !
खरंच किती भयंकर आहे ही आशाताईंनी गायलेली साहिरसाहेबांची ओळ! अगदी काल त्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या तारांगणातील हा चमचमणारा तारा आज कायमचा लुप्त झाला. बस एका क्षणाचा खेळ. पण अवघे आयुष्य जणू या ओळीशी नाते संभाळतच ही मनस्वी, स्पंदनशील गायिका आयुष्य जगली. जीवनाकडे नेहमी आशादायक दृष्टिकोन ठेवून अनेक चढउतारांचे आयुष्य जगलेल्या आशाताई एक चमत्कारच होत्या. तब्बल ७० वर्षाच्या त्यांच्या झगमगत्या कारकिर्दीत त्यांनी देशी-परदेशी अशा २० भाषात १२००० गाणी गायली आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एक जागतिक विक्रम नोंदवला होता. (त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन म्हणून त्यांच्या एका गाण्यावरचा दै. प्रहारमध्ये पूर्वी प्रकाशित झालेला एक लेख लेखकाच्या अनुमतीने आमच्या वाचकांसाठी साभार देत आहोत.)
जुने हिंदी सिनेमा आजही अनेक पिढ्यांच्या लक्षात आहेत ते त्यांच्या कथांमुळे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे या सिनेमातील गाण्यांमुळे. त्याकाळाच्या गायकांच्या अद्वितीय कलेमुळे! त्याकाळी पहायचा राहून गेलेला एखादा सिनेमा आपण आता थियेटरमध्ये किंवा युट्यूबवर पाहिला आणि त्यातील गाणी ऐकली तर अनेकदा वेगळेच वाटते. रेडिओवर जेव्हा आपण हे गाणे वर्षानुवर्षे ऐकत आलो होतो तेव्हा आपल्या मन:पटलावर झरझर उमटून गेलेली चित्रे किती वेगळीच होती असाही अनुभव हे चित्रपट पाहताना येतो. त्याकाळची गाणी आजच्या १०-१२ वर्षांच्या मुलांच्या तोंडीही मी ऐकलीयेत. कितीतरी पिढ्या आल्या अन् गेल्या पण या गाण्यांची, खरे तर त्यातल्या सुंदर कवितांची मोहिनी तशीच टिकून आहे.
यश चोपडा हे हिंदी सिनेमा जगतातील अतिशय यशस्वी दिग्दर्शक ! राजकुमार, बलराज सहानी, सुनील दत्त, शशीकपूर, साधना, शर्मिला टागोर अशा दिगज्जाना घेऊन त्यांनी काढलेला ‘वक्त’ हा चित्रपट एके काळी खूप गाजला. कथा तशी हिंदी चित्रपटसृष्टीला अगदी सवयीची! एका नैसर्गिक आपत्तीत पतीपत्नी आणि तिन्ही मुलांची, म्हणजे सगळ्या कुटुंबाची ताटातूट होते आणि ‘वक्त’चे म्हणजे नशिबाचे फेरे भोगून या सगळ्यांची शेवटी पुनर्भेट होते अशी ढोबळ कथावस्तू! परंतु अख्तर मिर्झांच्या या कथेला यश चोपडांनी जी ट्रीटमेंट दिली होती त्यामुळे हा सिनेमा कुठल्याकुठे पोहोचला होता. भावंडे हरविणे आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारचे जीवन जगून त्यांची पुन्हा अचानक भेट होणे हा ‘वक्त’नंतर हिंदी सिनेमात व्हिक्स वेपोरबसारखा ‘फॉर्म्युला-४४’च होऊन गेला. एकाच चित्रपटात अनेक स्टारना घेण्याचाही एक नवा पायंडा वक्तने पाडला. अशाच कथेवर १९४३साली अशोककुमार हिरो असलेला ‘किस्मत’ येऊन गेला होता पण वक्तने नवे रेकोर्ड बनविले. त्याचे तर तेलगु (भाले अब्बयीळू) आणि मल्याळम (कोलीलक्कम) अवतारही निघाले.
या सिनेमातील अख्तर उल इमान यांचे अनेक संवाद लोकांच्या तोंडी झाले होते आणि साहीर लुधियानवी यांची गाणी तर लोकांना तोंडपाठच होऊन गेली होती. रवी यांच्या संगीताची गोडी अवीट होती. एकापेक्षा एक नाट्यमय प्रसंगांनी भरलेल्या या सिनेमात प्रत्येक प्रसंगाला इतकी अनुरूप गाणी साहीरना कशी सुचतात हाच प्रश्न प्रेक्षकांना पडत असे. ‘ओ मेरी जोहराजबी, तुझे मालूम नही, तू अभीतक हैं हंसी, और मैं जवा’ सारखे सदाहरित गाणे असलेल्या या सिनेमात साहीरचे, ‘दिन हैं बहार के, तेरे मेरे इकरार के, दिल के सहारे, आ जा प्यार करे’ , आशाताईंनी लाडीक अंदाजात गायलेले ‘हम जब सिमट के आपकी बाहो मे आ गये,’ किंवा खास भाबड्या प्रेमिकेच्या भूमिकेत जाऊन गायलेले ‘चेहरेपे ख़ुशी छा जाती हैं, आंखोमे गुरुर आ जाता हैं,’ आणि ‘वक्त से दिन और रात, वक्त से कल और आज,’ अशी अर्थपूर्ण गोड गाणी दिली होती. आशाताईंच्या आवाजातील एका गीताने मात्र कहर केला. त्या गाण्यात क्लबमधल्या एका नर्तिकेच्या तोंडी साहीरने केवढे मोठे तत्वज्ञान टाकून दिले होते. आणि रवी या चिंतनशील संगीतकाराने साहीरचा शब्द न शब्द आशाताईच्या आवाजात अक्षरश: जिवंत केला होता. गाण्याचे बोल होते –
“आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू,
जो भी हैं, बस यही एक पल हैं.”
लाला केदारनाथ (बलराज साहनी) या एका श्रीमंत माणसाच्या मुलांचा वाढदिवस साजरा होत असतो तेव्हा एक ज्योतिषी त्यांना सांगतो, ‘लाला, फार गर्व करू नका, नशीब उद्या आपल्या आयुष्यात काय घडवेल ते आपल्याला माहित नसते. तेव्हा सावध असा.’ त्याच रात्री एक मोठा भूकंप होऊन लाल केदारनाथांची प्रशस्त हवेली आणि सगळे वैभव धुळीला मिळते. कुटुंबातली तिन्ही मुले तीन दिशांना फेकली जातात आणि सगळे एकमेकांपासून हरवतात. साडेतीन तास चालणारा हा चित्रपट सुमधुर संगीत, अर्थपूर्ण गाणी आणि त्यातले चमकदार संवाद यामुळे अनेकांनी अनेकदा पाहिला होता.
‘आगे भी जाने ना तू..’ या गाण्याच्या वेळी शशिकला आणि राजकुमार हातात हात घेऊन गाण्याच्या संथ चालीवर सूर असलेल्या काहीशा पाश्चिमात्य संगीतावरील नाचात मग्न असतात तर दुसरीकडे दुसरी प्रेमी जोडी, सुनीलदत्त आणि साधना, एका कारंज्याजवळ हितगुज करीत उभे असतात असे दृश्य होते. या गाण्यात संध्याकाळच्या धुंद पार्टीत नाचणा-या नर्तिकेच्या तोंडातून साहीरने जणू चार्वाकच मांडलाय. ‘जो भी हैं बस यही एक पल हैं, जीनेवाले सोच ले, यही वक्त हैं, कर ले पुरी आरजू.’ असे म्हणून जीवनाचा पुरेपूर उपभोग घेण्याचे आवाहनच तो करतो. या गाण्यातली प्रतिमासृष्टी किती मोहक आहे –
‘अंजाने सायो का, राहो मे डेरा हैं,
अनदेखी बाहो ने, हम सब को घेरा हैं.’
हे शब्द केवढे तरी गूढ, काहीसे भीतीचे सावट सूचित करणारे पण रम्य चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे करतात. त्यात आशाताईंनी लावलेला मुग्ध, धुंद स्वर! मग जीवनाची अशाश्वतता, गूढता, अतर्क्यता स्पष्ट करणा-या ओळी जिवंत होऊन जातात.
‘ये पल उजाला हैं, बाकी अंधेरा हैं,
ये पल गवांना ना, ये पलही तेरा हैं.’
जीवनाचे क्षणभंगुरत्व किती चित्रमय रुपात आपल्यासमोर उभे करते हे गाणे! जगणे कधीच उद्यावर, अगदी पुढच्या क्षणावरही, टाकू नये हा आधुनिक विचार साहीरने १९६५च्या चित्रपटात मांडलाय हे लक्षात आल्यावर खरेच कौतुक वाटते! खरेच आपल्या हातातला हा एकच क्षण तर आपला असतो. याआधीचा क्षण तर केळीच्या पानावरून दवबिंदू ओघळून जावा तसा कायमचा हरविलेला असतो. पुढच्या क्षणाची शाश्वती नसते. आपल्या हातातल्या घड्याळातील सेकंदकाटा एक गिरकी घेईपर्यंतचीच आपली खात्री! तेवढीच आपली हुकुमत!
किती कमी शब्दात साहिरने जगण्याची तातडी स्पष्ट केलीये ते पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. जे जगायचे आहे, करायचे आहे, भोगायचे आहे, त्यागायचे आहे, ते आत्ताच! जगणे फक्त या क्षणातच शक्य आहे असे कवी सांगतोय तेही किती कलात्मकपणे! अगदी हळूवारपणे मधाची धार कुणीतरी जिभेवर अलगद सोडावी तसे ते रवीचे या गूढ गाण्याला दिलेले सुमधुर संगीत ! अगदी कहर आहे हे गाणे म्हणजे !
साहीर म्हणतो, ‘या क्षणाच्या सौंदर्याने जगण्याची सारी मैफल सजलीये रे, या क्षणाच्या उबदार जाणिवेनेच तर तुझ्या मनातली धडधड वाढली आहे. या क्षणाच्या अस्तित्वात तर ही दुनिया आम्हाला आमची वाटते.’ असे आपल्या मनात उतरवून तो म्हणतो, ‘नीट विचार करशील तर तुला पटेल हातात असलेला हा एक क्षणच कल्पनेतल्या शेकडो वर्षांपेक्षा मोठा आहे, मित्रा!’ केवढे तत्वज्ञान साहिरने एकेका ओळीत मांडले आहे. गंमत म्हणजे हे सगळे कुठे? तर क्लबमध्ये नाचणा-या एका नर्तिकेच्या मुखात ! आशाताईंच्या आवाजाबद्दल मला नेहमी वाटते तो मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या मधासारखा आहे पण आशाताईंचा खोडकरपणा त्यात हळूच थोडी वाईन मिसळून टाकतो आणि आपल्याला एवढे बेधुंद कां वाटते आहे ते श्रोत्याला कळतच नाही!
आपण कितीतरी गोष्टी उद्यावर ढकलतो. कितीतरी स्वप्नांना हात वर करून थांबायला सांगतो जणू आपल्याला खात्रीच असते उद्याची ! ..आणि एक दिवस सगळेच हातातून निसटून जाते. अनेक दिगज्ज अभिनेते, अभिनेत्रींना घेऊन काढलेला हा एक चित्रपट. उत्तम संवाद, नाट्यमय प्रसंगनिर्मिती, लाजवाब अभिनय, अर्थगंभीर गाणी आणि सूमधुर संगीत यामुळे काळाच्या भिंतीवर आपला चमकदार ठसा उमटवून गेला. आज या चित्रपटातले कितीतरी चेहरे गाण्यातल्या ओळींप्रमाणे, ‘इस पल के आगे ही हर शै फसाना हैं.’ तसे ‘फसाना’ होऊन गेलेत. त्यांच्या फक्त स्मृती शिल्लक राहिल्यात. एका पिढीबरोबर त्याही कायमच्या पुसल्या जातील.
याच सिनेमातील मन्ना डेच्या आवाजातल्या गाजलेल्या रंगील्या, दमदार आवाजातल्या ‘तू अभीतक हैं हंसी और मै जवां’ या ओळींप्रमाणे अजूनही हातात टिकटीक करीत असलेल्या जीवनाच्या घड्याळात आलेला संदेश अंगीकारायला काय हरकत आहे? जे हातातून निसटून गेले त्याची उदासीनता झटकून टाकून जो क्षण हातात आहे त्याला समोर ठेवून आपणच आपल्या हट्टी मनाला सांगायला काय हरकत आहे, ‘यही वक्त हैं, कर ले पुरी आरजू!’ 💐
- श्रीनिवास बेलसरे
७२०८६३३००३
Asha Bhosle songs, Sahir Ludhianvi quotes, Waqt movie songs, Aage bhi jaane na tu meaning, Classic Hindi songs, Old Bollywood songs, Evergreen Hindi songs, Bollywood golden era music, Asha Bhosle biography, Sahir Ludhianvi poetry






